महाराष्ट्रात मास्क सक्तीच्या हालचाली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठी घोषणा करणार?

| Updated on: Dec 25, 2022 | 4:46 PM

चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार सुरुय. चीनमध्ये लाखो नागरिकांना पुन्हा कोरोनाची लागण झालीय. रुग्णालयांमध्ये उपचारासाठी बेड्स मिळत नाहीयत.

महाराष्ट्रात मास्क सक्तीच्या हालचाली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठी घोषणा करणार?
Image Credit source: Freepik
Follow us on

गिरीश गायकवाड, मुंबई : चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार सुरुय. चीनमध्ये लाखो नागरिकांना पुन्हा कोरोनाची लागण झालीय. रुग्णालयांमध्ये उपचारासाठी बेड्स मिळत नाहीयत. अनेकांचा मृत्यू होतोय. त्यामुळे संपूर्ण जगाची झोप उडालीय. कोरोनाने काढलेलं हे डोकंवर सर्व जगासाठी डोकंदुखी ठरू शकतं. त्याचपार्श्वभूमीवर आपल्या देशातही आता काळजी घेतली जातेय. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासाठी सर्व राज्यांना अलर्ट देखील केलंय. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक मंदिरांमध्ये पुजाऱ्यांसाठी मास्क सक्ती करण्यात आलीय. या मंदिरांमधील मास्कसक्तीच्या बातमीनंतर आता आणखी महत्त्वाची बातमी समोर आलीय. राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मास्कसक्ती होण्याची शक्यता आहे.

मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत घोषणा करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातील कोण-कोणत्या मंदिरांमध्ये मास्कसक्ती?

दरम्यान, महाराष्ट्रातील काही मंदिरांमध्ये मास्कसक्ती करण्यात आलीय.

ढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पुजारी आणि कर्मचाऱ्यांना मास्क अनिवार्य करण्यात आलाय. भाविकांनाही मास्क वापरण्याचं आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलंय.

शिर्डीच्या साई मंदिरात आणि शनिशिंगणापूरच्या मंदिरातही मास्कसक्ती करण्यात आलीय. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी ही घोषणा केलीय.

तुळजाभवानी मंदिरातही कर्मचाऱ्यांना मास्कसक्ती करण्यात आलीय. भाविक मात्र मंदिरात विनामास्कच वावरत असल्याचं दिसतंय.

देहूच्या मुख्य मंदिरात भाविकांना अद्याप मास्कसक्ती करण्यात आलेली नाही. मात्र कोरोना नियमांचे पालन करण्याचं आवाहन संस्थानच्या वतीनं करण्यात येतंय.

अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मंदिर मंदिरातही मास्क सक्ती करण्यात आलीय. भक्तांनी दर्शनासाठी मास्क घालूनच मंदिरात यावं असं आवाहन मंदिर प्रशासनानं केलंय.

खबरदारी म्हणून मंदिर समितीनं भक्तांना मास्कचं वाटपही केलंय.

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानातही मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आलाय. मंदिरात येणाऱ्या भाविकांना मास्क परिधान करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नाशिक जिल्ह्यातल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठीही नो मास्क नो एन्ट्रीचा नियम करण्यात आलाय. सुरक्षित अंतर ठेऊनच भाविकांनी दर्शन घ्यावं असं आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आलंय.

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आलीय. त्यामुळं कर्मचारी आणि पुजारी मास्क लावूनच कामावर येताना दिसतायत.

भाविकांना मात्र अद्याप मास्क सक्ती करण्यात आलेली नाही.

चीन, ब्राझील, अमेरिका, जपान, दक्षिण कोरियात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं चिंता वाढवलीय. त्यामुळं भारतात आत्तापासूनच खबरदारी घेतली जातेय.