आतली बातमी, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या पहिल्या महाअधिवेशनात काय-काय ठरलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाचा आज कोल्हापुरात पहिला महामेळावा पार पडला. या महामेळाव्यात पक्षाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे निर्णय जास्त महत्त्वाचे आहेत.

आतली बातमी, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या पहिल्या महाअधिवेशनात काय-काय ठरलं?
Chetan Patil | Updated on: Feb 16, 2024 | 10:01 PM

कोल्हापूर | 16 फेब्रुवारी 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचा कोल्हापुरात आज महामेळावा पार पडला. या मेळाव्यात नेमकी काय चर्चा झाली, काय निर्णय घेण्यात आले याबाबतची माहिती आता समोर आली आहे. मेळाव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. शिवसेनेच्या महामेळाव्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. “आमचे पहिले पक्षाचे अधिवेशन आज पार पडले. आम्ही राज्य आणि राष्ट्रातील महिलांसाठीच्या प्रगती, विकास योजना आणि पायाभूत सुविधा प्रकल्प योजनांवर चर्चा केली. आम्ही पीएम नरेंद्र मोदींचा विकासाचा अजेंडा आणि राम मंदिराच्या अभिषेकासाठी अभिनंदन करणारा ठराव समंत केला. आगामी लोकसभा निवडणुकीत मिशन 48 जागा मिळवण्याचं वचन दिलं”, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यावेळी त्यांनी रत्नागिरीत शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षावर प्रतिक्रिया दिली. “ही दुर्दैवी घटना आहे. ते आपल्या राज्याच्या संस्कृतीला शोभत नाही. कोणीही कायदा हातात घेऊ नये. जे दोषी असतील त्यांना शिक्षा होईल”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

‘लोकसभेच्या 48 जागा जिंकण्याची आम्ही शपथ घेतली’

मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत माहिती दिली. “लोकसभेच्या जागा वाटपाचा अधिकार एकनाथ शिंदेना देण्याता आला”, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. तसेच खासदार राहुल शेवाळे यांनी देखील याबाबत महत्त्वाची माहिती दिली. “लोकसभेच्या निवडणुकीत 48 जागा जिंकण्याची आम्ही शपथ घेतली आहे. महाअधिवेशनात लोकसभेच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. आम्ही 400 पारचा नारा देणार आहोत. महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा महत्त्वाच्या आहेत”, असं खासदार राहुल शेवाळे म्हणाले.

मिलिंद देवरा म्हणाले, ‘मी शिवसेनेत आलो याचा आनंद’

काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून शिवसेनेत पक्षप्रवेश केलेले नेते मिलिंद देवरा यांनी महामेळाव्यानंतर प्रतिक्रिया दिली.”माझ्यासाठी आनंदाचा विषय आहे की, पहिल्याच महाअधिवेशनामध्ये मला भाषणाची संधी मिळाली. माझी कर्मभूमी मुंबई आहे. पण माझ्या आजीचे माहेर कोल्हापूर आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्हिजनवर लोक विश्वास ठेवतील आणि सहा महिन्यात जेव्हा विधानसभा निवडणुका येतील तेव्हा सुद्धा यश मिळेल. मी एकनाथ शिंदे यांचा आणि पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांचे देखील आभार मानतो. देशात आज दोन राजकीय पक्ष मोठं काम करत आहेत. देशात भाजप आणि राज्यात शिवसेना”, अशी प्रतिक्रिया मिलिंद देवरा यांनी दिली.

“मला आनंद आहे की मी शिवसेनामध्ये आलो. मला आज काँग्रेसबद्दल बोलायचं नाही. जेव्हा 2019 मध्ये महाविकास आघाडी बनत होती तेव्हा मी विरोध केला होता. पण सत्तेसाठी संधीसाधूपणा करत ते सत्तेत गेले. काँग्रेसमध्ये काय कमी आहे ते मी योग्यवेळी सांगेन. मी त्यांना आता एवढंच सांगेन की एक सकारात्मक विरोधक बनले पाहिजे. पण दुर्दैवाने ते होत नाही. हा ट्रेलर आहे. पिच्चर बाकी आहे. महायुतीत आम्ही सर्व जागा जिंकू असा विश्वास मला आहे”, असं मिलिंद देवरा म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us