पी.बी. सावंतांनी महाराष्ट्राचं पुरोगामीपण जपलं, निर्भीड आणि परखड विचारधारा तेवत ठेवली: मुख्यमंत्री

| Updated on: Feb 15, 2021 | 2:38 PM

गाढा अभ्यास आणि विविध विषयांतील प्रभुत्व यामुळे त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या संस्था, आयोग, लवाद याठिकाणी काम करताना आपला असा ठसा उमटवला आहे. | P B Sawant

पी.बी. सावंतांनी महाराष्ट्राचं पुरोगामीपण जपलं, निर्भीड आणि परखड विचारधारा तेवत ठेवली: मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई: निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या निधनाविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला. माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांचे न्यायदानाच्या क्षेत्रातील आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या वाटचालीतील कार्य सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पी.बी.सावंत यांना श्रद्धांजली वाहिली. (Retired Supreme Court judge Justice P B Sawant passes away in Pune)

न्या. पी.बी. सावंत यांनी न्यायादानाच्या क्षेत्रात महाराष्ट्राची प्रतिमा उजळून टाकणारे कार्य केले आहे. गाढा अभ्यास आणि विविध विषयांतील प्रभुत्व यामुळे त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या संस्था, आयोग, लवाद याठिकाणी काम करताना आपला असा ठसा उमटवला आहे.
निवृत्तीनंतरही त्यांनी समाज प्रबोधन आणि सामाजिक चळवळीत काम करताना मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली आहे. न्याय व विधी क्षेत्रात मोलाचे कार्य करतानाच त्यांनी पुरोगामी महाराष्ट्राच्या वाटचालीत निर्भीड आणि परखड विचारधारा कायम राहील यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या जाण्याने या दोन्ही क्षेत्रासाठींचे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांचे कार्य महाराष्ट्राच्या सदैव स्मरणात राहील, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

पी. बी. सावंत यांचं सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता निधन झालं. वयाच्या 91 व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी पुण्यातील बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पी. बी. सावंत यांची अतिशय कडक शिस्तीचे न्यायमूर्ती म्हणून ओळख होती. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांचा निकाल लागला.

पी. बी. सावंत यांची कारकीर्द

पी. बी. सावंत यांचा जन्म 30 जून 1930 रोजी झाला. मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी (एलएलबी) मिळवल्यानंतर पी. बी. सावंत यांनी मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली म्हणून सराव सुरु केला. 1973 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली; त्याच्या उल्लेखनीय कामांपैकी एक म्हणजे जून 1982 मधील एअर इंडिया विमान अपघाताची चौकशी. 1989 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात नियुक्त करण्यात आले. 1995 मध्ये ते निवृत्त झाले.

पी. बी. सावंत यांच्या नेतृत्वात आयोग

एक सप्टेंबर 2003 रोजी तत्कालीन महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, सुरेश जैन आणि विजयकुमार गावित यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या आयोगाचे पी. बी. सावंत अध्यक्ष होते. त्यांनी 23 फेब्रुवारी 2005 रोजी आपला अहवाल सादर केला, ज्यात नवाब मलिक, पद्मसिंह पाटील आणि सुरेश जैन यांच्यावर आरोप होते, परंतु विजयकुमार गावित यांना दोषमुक्त केले गेले. यामुळे दोन कॅबिनेट मंत्री सुरेश जैन आणि नवाब मलिक यांनी राजीनामा दिला.

(Retired Supreme Court judge Justice P B Sawant passes away in Pune)