शिर्डीत पोहोचले, मुख्यमंत्र्यांचा फोन येताच प्रसाद लाड माघारी फिरले, तातडीने जरांगेंच्या भेटीला; घडोमोडींना प्रचंड वेग

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तातडीचा फोन आल्याने प्रसाद लाड यांनी आपला दौरा अर्धवट सोडून पुन्हा अंतरवली सराटीकडे धाव घेतली आहे. ते अंतरवलीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत.

शिर्डीत पोहोचले, मुख्यमंत्र्यांचा फोन येताच प्रसाद लाड माघारी फिरले, तातडीने जरांगेंच्या भेटीला; घडोमोडींना प्रचंड वेग
Prasad Lad
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 30, 2026 | 1:21 PM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रखरखत्या उन्हात आमरण उपोषण सुरू केलं आहे. जरांगे यांनी उपोषण मागे घेण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रयत्न केला. पण जरांगे मागे हटण्यास तयार नाहीत. विखे पाटील यांनी मागण्यांचा मसुदाही जरांगेंना दिला. पण जरांगे यांनी त्यावर संध्याकाळी निर्णय घेणार असल्याचं सांगून उपोषण सुरूच ठेवलं. त्यामुळे सरकार अधिकच टेन्शनमध्ये आलं आहे. आमदार प्रसाद लाड हे काल जरांगेंना भेटले. आज ते मुंबईला निघाले होते. ते शिर्डीपर्यंत आल्यावर त्यांना मुख्यमंत्र्यांचा फोन आला. आदेश मिळाले आणि लाड तात्काळ माघारी फिरले. जरांगेंच्या भेटीला अंतरवलीकडे निघाले आहेत.

मुख्यमंत्र्यांचा फोन आला अन्…

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद लाड हे शिर्डी येथील दर्शन उरकून मुंबईकडे परतीच्या प्रवासाला लागले होते. मात्र, प्रवासात असतानाच त्यांना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. या फोनवरील चर्चेनंतर लाड यांनी तातडीने आपला निर्णय बदलला आणि मुंबईकडे जाणारी गाडी पुन्हा अंतरवली सराटीच्या दिशेने वळवली. मुख्यमंत्र्यांच्या या अनपेक्षित फोनमुळे आणि लाड यांच्या अचानक माघारी फिरण्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

प्रसाद लाड पोहोचण्यापूर्वी विखे अंतरवलीमध्ये

विशेष म्हणजे, प्रसाद लाड हे अंतरवली सराटीकडे रवाना होण्यापूर्वीच, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. विखे पाटलांच्या या महत्त्वपूर्ण भेटीनंतर लगेचच प्रसाद लाड हे देखील जरांगे यांच्या भेटीसाठी पुन्हा रवाना झाल्याने, सरकारच्या पातळीवर या प्रश्नावर काहीतरी मोठी आणि तातडीची तडजोड किंवा चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सरकारकडून जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे या सर्व घडामोडींवरून दिसून येत आहे.

या मागण्यांवर सहमती

>> कुणबी प्रमाणपत्रांबाबत राज्य सरकारवतीने अधिकृत सूचना देणार आहे. प्रत्येक अधिकाऱ्यांना सूचना दिली जाणार आहे

>> 58 लाख नोंदी सापडल्या कुणबीप्रमाणपत्र द्या. दिले असेल तर व्हॅलिडिटी देणार आहे. ज्या अधिकाऱ्याने प्रमाणपत्र दिलं नाही, त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश काढणार आहेत.

>> जात पडताळणीचा आढावा प्रत्येक 15 दिवसाने घेणार आहे.

>> स्वतंत्र मराठा मंत्रालय एक महिना मागितला. मुख्यमंत्र्यांनी एका दिवसात निर्णय घ्यावा

>> बलिदान दिलेल्यांना 15 दिवसात पैसे देणार.

>> कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपाबाबतचा आढावा दर 8 दिवसाने घेणार, जिल्हाधिकारी कार्यालयाला हेल्पलाईन देऊ. हे मान्य

>> ग्रामस्तरीय कामकाजाचा आढावा 15 दिवसात घेणार आहे. त्याच्याही सूचना काढणार आहेत. त्याही काढतो म्हणाले.

>> अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे पैसेही देतो म्हणाले. त्याच्याही सूचना काढणार आहे.

Follow Us