कॉक्रोच जनता पार्टी प्रकरणात आता आयबीची एन्ट्री? बड्या नेत्याच्या दाव्यानं मोठी खळबळ, नेमकं काय घडतंय?
सध्या देशभरात कॉक्रोच जनता पार्टीची जोरदार चर्चा सुरू आहे, मात्र या पार्टीचं ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आलं आहे. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना बड्या नेत्यानं मोठा दावा केला आहे.

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतीय तरुणाई झुरळासारखी असल्याचं म्हटलं होतं. सरन्यायाधीश यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मराठी तरुण असलेल्या अभिजीत दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली, या पक्षाला सोशल मीडियावर तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ होत आहे, त्यानंतर या पार्टीचं भारतामधील ट्विटरचं अकाउंट संस्पेंड झालं आहे. दरम्यान यावर बोलताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मोठा दावा केला आहे, पटोले यांच्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कॉक्रोच जनता पार्टीचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यामागे केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचा हात आहे, देशातील जनतेच्या उद्रेकाची माहिती आयबीनं केंद्राला दिली, गोपनिय अहवालानंतरच कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट हॅक करण्यात आलं, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले नाना पटोले?
मला रिपोर्ट आला त्यानुसार आयबीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं की उद्रेक होऊ शकतो. हा उद्रेक थांबवण्यासाठी याला ब्लॉक केलं पाहिजे, अशा पद्धतीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली गेली, त्यानंतर हा निर्णय झाला आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, फक्त सोशल मीडियाचं अकाउंट बंद करून हा प्रश्न सुटणार नाही, तरुणांच्या मनात जो राग आहे, तो राग हे कमी करू शकत नाहीत, यांनी देश विकला आहे, आणि म्हणूनच देश वाचवण्यासाठी या पद्धतीचा आता उद्रेक सुरू झाला आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा देशात जाणवत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पेट्रोल-डिझेल, गॅस हा कोणाच्या चुकीच्या विदेश नीतीमुळे माहग झाला? याचं पहिल्यांदा त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. यांच्या धोरणामुळे आपला परंपरागत मित्र असलेला इराण आपल्यापासून दूर झाला, त्यामुळे देशात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असं पटोले यांनी म्हटलं आहे.