ग्रामपंचायत निवडणूक : रिअ‍ॅलिटी चेक करा, भाजप चौथ्या नंबरचा पक्ष, सत्यजित तांबेंचा टोला

| Updated on: Jan 19, 2021 | 2:18 PM

युवक काँग्रेसचे जे पदाधिकारी निवडून आलेले आहेत, त्यांच्यावरच आम्ही दावा करत असल्यामुळे तो महत्त्वाचा आहे, असं तांबे यांनी स्पष्ट केलं (Satyajeet Tambe asks BJP for reality check)

ग्रामपंचायत निवडणूक : रिअ‍ॅलिटी चेक करा, भाजप चौथ्या नंबरचा पक्ष, सत्यजित तांबेंचा टोला
Follow us on

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीबाबत सर्वच राजकीय पक्ष विविध दावे करत असताना प्रदेश युवक काँग्रेसनेही यात उडी घेतली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत युवक काँग्रेसचे 500 पेक्षा जास्त पदाधिकारी निवडून आले असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केला आहे. विशेष म्हणजे राज्यात भाजप चौथ्या नंबरचा पक्ष असल्याचंही सत्यजित तांबे म्हणाले. (Congress Leader Satyajeet Tambe asks BJP a reality check claims party on fourth number)

युवक काँग्रेसचे जे पदाधिकारी निवडून आलेले आहेत, त्यांच्यावरच आम्ही दावा करत असल्यामुळे तो महत्त्वाचा आहे, असं तांबे यांनी स्पष्ट केलं. रिअ‍ॅलिटी चेक केला, तर भाजप राज्यात चार नंबरचा पक्ष असल्याचं समजेल, असंही तांबे म्हणाले.

युवक कॉंग्रेसचे 500 हून अधिक पदाधिकारी विजयी

“ग्रामपंचायत निकालांमध्ये 500 पेक्षा अधिक युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी निवडून आले आहेत, त्यांचे अभिनंदन! स्व. राजीवजी गांधी यांच्या स्वप्नातील पंचायत राज व्यवस्था युवकच घडवू शकतात, यात माझ्या मनात शंका नाही. लवकरच या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे प्रशिक्षण आम्ही घेऊ. यामध्ये त्यांना सामान्य माणसांप्रति जबाबदार प्रतिनिधित्व करण्यास प्रशिक्षित करु” अशी घोषणाही तांबेंनी ट्विटरवर केली.

नवीन नेतृत्वाला प्रशिक्षण देण्याची घोषणा

“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून नवीन नेतृत्व तयार होण्यासाठी निवडणूक एक मोठी संधी असते. मी स्वतःही दहा वर्ष जिल्हा परिषद सदस्य राहिलो आहे. त्यामुळे मला या गोष्टीची जाणीव आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतून नवीन नेतृत्व मिळण्यास कशी मदत होते” असंही सत्यजित तांबे म्हणाले.

भाजपचा दावा काय?

कुणी कितीही दावा केला असला तरी माझ्याकडे आकडेवारी आहे. आम्ही राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक म्हणजे सुमारे सहा हजार ग्रामपंचायती जिंकल्या आहेत, असा दावा भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.  राज्यातील 1600 बिनविरोध ग्रामपंचायींपैकी आम्ही 580 ग्रामपंचायती बिनविरोध जिंकल्या आहेत. त्या वगळता आम्ही 6 हजारापेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. गडचिरोली आणि इतर ग्रामपंचायतीचे निकाल यायचे बाकी असून त्यातही भाजपला घवघवीत यश मिळेल, असा दावा उपाध्ये यांनी केला


संबंधित बातम्या :

भाजपने 6 हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्या; केशव उपाध्ये यांचा दावा

 आघाडी जिंकली, पण भाजपच नंबर वन; आता सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी

(Congress Leader Satyajeet Tambe asks BJP a reality check claims party on fourth number)