जो तीनवेळा विनामास्क दिसेल, त्याला राष्ट्रवादीचं तिकीट नसेल, सुप्रिया सुळेंचा कडक नियम

खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना इशारा दिलाय. जो कार्यकर्ता किंवा सदस्य 3 वेळा विनामास्क दिसेल त्याला तिकीटच देऊ नका, असा आदेशच सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना दिला आहे.

जो तीनवेळा विनामास्क दिसेल, त्याला राष्ट्रवादीचं तिकीट नसेल, सुप्रिया सुळेंचा कडक नियम
खासदार सुप्रिया सुळेंचा आपल्या कार्यकर्त्यांना इशारा
| Edited By: | Updated on: Jun 17, 2021 | 7:12 PM

इंदापूर : कोरोना नियमांच्या बाबतीत उपमुख्यमंत्री अजित पवार किती काटेकोरपणे वागतात हे अनेकदा दिसून आलंय. कुठल्याही कार्यक्रमात ते मास्क घालूनच सहभागी होतात. इतकंच नाही तर कुठल्या कार्यक्रमात त्यांना पुष्पगुच्छ देणाऱ्यालाही अजितदादा चांगलंच सुनावताना दिसून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अजितदादा कडक शब्दात समज देतानाही पाहायला मिळाले. आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना इशारा दिलाय. जो कार्यकर्ता किंवा सदस्य 3 वेळा विनामास्क दिसेल त्याला तिकीटच देऊ नका, असा आदेशच सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना दिला आहे. (MP Supriya Sule warns NCP workers who not wear masks)

सुप्रिया सुळे आज इंदापूर तालुक्याताली सपकळवाडी इथं एका कार्यक्रमात बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी अजित पवारांच्या कोरोना नियम पाळण्याच्या सवयीचं कौतुक केलं. अजितदादांचा मास्क दीड वर्षात खाली आला नाही. कुठल्या कारणासाठी मास्क काढावा लागला तर ते काही सेकंदात पुन्हा घालतात. अशावेळी माझी जिल्हाध्यक्षांना विनंती आहे की, ज्या सदस्यांचे तीन वेळा विनामास्क फोटो पुढे येतील त्यांना तिकीटच देऊ नका, असा आदेशच सुप्रिया सुळे यांनी दिलाय. त्याचबरोबर मागील दीड वर्ष आणि पुढील एक वर्ष पंतप्रधान मोदी यांनी आमचा खासदार निधी कापल्याचंही त्यांनी सांगितलं.

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी सुप्रिया सुळेंचा पुढाकार

कोरोनामुळे अनेक मुलांनी आपल्या आई किंवा वडिलांना गमवाले आहे. काहींनी दोघांनाही गमावले आहे. अशा मुलांना आधार देण्याची गरज आहे. कोरोनामुळे अनाथ झालेलं एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये. त्यासाठी दोन्ही सरकारच्या यंत्रणांनी परस्पर सामंजस्य व गांभिर्याने काम करण्याची आवश्यकता आहे, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करून ही प्रतिक्रिया व्यक्त केली. कोरोनाच्या विषाणूंमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक मुलांच्या डोक्यावरचे माता-पित्यांचे छत्र नष्ट झाले आहे. घरातील कमावत्या पालकाचे कोरोनामुळे निधन झाल्यामुळे अनेक मुलांच्या भविष्याचा प्रश्न देखील प्रकर्षाने पुढे आला आहे. त्यांचे शिक्षण,आरोग्य इ.ची काळजी घेणे आवश्यक आहे, असं सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

संबंधित बातम्या : 

कोरोना काळात अनाथ झालेल्यांसाठी 10 लाखांचा निधी, मोदींची मोठी घोषणा; काय आहे योजना?, वाचा!

कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई-वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, पुणे प्रशासनाचा मोठा निर्णय

MP Supriya Sule warns NCP workers who not wear masks