नवी मुंबईकरांना मोफत कोरोना लस द्या; गणेश नाईकांची महापालिकेकडे मागणी

| Updated on: Feb 21, 2021 | 5:07 PM

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने आता कोरोना लसीची मागणीही वाढली आहे. (corporation should provide free corona vaccine for navi mumbai people)

नवी मुंबईकरांना मोफत कोरोना लस द्या; गणेश नाईकांची महापालिकेकडे मागणी
Follow us on

नवी मुंबई: राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने आता कोरोना लसीची मागणीही वाढली आहे. भाजप नेते गणेश नाईक यांनी तर नवी मुंबईकरांना कोरोनाची लस मोफत द्या, अशी मागणी केली आहे. ऐन पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाईक यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडे ही मागणी केल्याने त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. (corporation should provide free corona vaccine for navi mumbai people)

क्रिस्टल हाऊस येथे आज शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी गणेश नाईक यांनी ही मागणी केली. शिवसेना उपविभाग प्रमुख मनोज शिंदे, शाखा प्रमुख सागर शिंगाडे, माजी उपविभाग प्रमुख शंकर पाटील, आनंद पवार, उपविभाग संघटक मीनाताई पाटील, अखलाक शेख यांच्यासह राष्ट्रवादीचे राहुल कश्यप या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी आज नवी मुंबई भाजपा निवडणूक प्रभारी आमदार आशिष शेलार आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, सागर नाईक, संदीप नाईक यांच्यासह संजय उपाध्याय असे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पक्षात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करुन आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील जनतेच्या सेवेसाठी आपण काम करीत आहोत. जनतेने आपल्या प्रेम दिले असेही त्यांनी नमूद केले.

कोरोना लसीसाठी 150 कोटींची तरतूद करा

कोरोना लस आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत उपलब्ध करुन देण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकूण आर्थिकदृष्ट्या विचार करुन सामान्य नागरिकांना कशी लस उपलब्ध करून देणार याबाबत निर्णय घेतीलच. पण जर केंद्र सरकारने ही लस सर्वसामान्यांना मोफत उपलब्ध करुन दिली नाही तर नवी मुंबईतील सुमारे 15 लाख नागरिकांना महापालिकेने लस मोफत उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी बजेटमध्ये 150 कोटींची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी आपण नुकतीच पालिका आयुक्तांकडे केली आहे. नवी मुंबईतील नागरिकांना मोफत लस मिळावी हीच आमची भूमिका आहे, असे नाईक यांनी सांगितले.

आघाडीच्या पराभवाची सुरुवात नवी मुंबईतून होईल

भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या पराभवाची सुरुवात नवी मुंबईतून होईल, असं भाकित केलं. गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे शहर देशातील एक नंबरचे स्वच्छ शहर झाले. या स्वच्छ शहराला आता भाजपाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर करायचे आहे. त्यामुळे नवी मुंबईतील जनता भाजपालाच विजयी करेल, असा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला. (corporation should provide free corona vaccine for navi mumbai people)

 

संबंधित बातम्या:

मोठी बातमी : अमरावतीत आठवडाभरासाठी लॉकडाऊन, मंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा

लॉकडाऊन, संचारबंदी, नवे हॉटस्पॉट, नवे निर्बंध, विदर्भात कोणत्या जिल्ह्यात काय?; वाचा स्पेशल रिपोर्ट

भाजपने पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर आंदोलन करावं, संजय राऊतांचा खोचक सल्ला

(corporation should provide free corona vaccine for navi mumbai people)