ऐन सणात शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला; पावणेदोन लाख हेक्टरवरचे पीक पाण्यात, नाशिकसाठी 147 कोटींची मागणी

| Updated on: Oct 15, 2021 | 12:33 PM

ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला गेला असून एकट्या नाशिक जिल्ह्यात एक लाख 71 हजार हेक्टरवरचे पीक पाण्यात गेल्याचे पंचनाम्यातून उघड झाले आहे. त्याचा तडाखा जिल्ह्यातील दोन लाख 24 हजार 919 शेतकऱ्यांना बसला आहे. या नुकसानीच्या भरपाईपोटी प्रशासनाने 147 कोटींची मागणी शासनाकडे केली आहे.

ऐन सणात शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला; पावणेदोन लाख हेक्टरवरचे पीक पाण्यात, नाशिकसाठी 147 कोटींची मागणी
Follow us on

नाशिकः ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला गेला असून एकट्या नाशिक जिल्ह्यात एक लाख 71 हजार हेक्टरवरचे पीक पाण्यात गेल्याचे पंचनाम्यातून उघड झाले आहे. त्याचा तडाखा जिल्ह्यातील दोन लाख 24 हजार 919 शेतकऱ्यांना बसला आहे. या नुकसानीच्या भरपाईपोटी प्रशासनाने 147 कोटींची मागणी शासनाकडे केली आहे.

अतिवृष्टीने नाशिक जिल्ह्यात अक्षरशः थैमान घातले. त्यात मालेगाव, मनमाडमध्ये दोन-दोनदा पुराचे तडाखे बसले. सोयाबीन, कांदे, बाजरी, मका, तांदूळ असे पीक उद्धवस्त झाले. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात आहे. या नुकसानीचे भयावह आकडे आता समोर येत आहेत. जिल्ह्यातील पावणे दोन लाख हेक्टरवचे पीक पाण्यात गेले आहे. या नुकसानीपोटी जिरायती पिकासाठी मदत म्हणून 8957.01 लाखांची मागणी करण्यात आली आहे. बागायत पिकासाठी 4367.98 लाखांच्या निधीची मागणी केली आहे. वार्षिक फळपिकांसाठी 18.35 लाख, तर बहुवार्षिक फळपिकांसाठी 1377.99 लाखांची अशी एकूण 147 कोटी 21 लाखांच्या मदतीची मागणी करण्यात आली आहे. नांदगाव-मालेगावमध्ये पावसाने कांद्याची उभी पिके आडवी झाली आहेत. फळबागांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष व डाळिंब बागा उद्धवस्त झाल्या आहेत. अनेक घरांवरील वाऱ्यामुळे पत्रे उडाले आहेत. अनेक घरे पडली आहेत. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. इथे बारा वर्षांत पहिल्यांदा इतका पाऊस पडला आहे. 12 तासांमध्ये 121 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले असून, खरीप हंगाम हातचा गेला आहे.

धरणे ओसंडली

नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण भरले आहे. गंगापूर धरण समूहात गंगापूर (मोठे), काश्यपी (मध्यम), गौतमी गौदावरी (मध्यम) आणि आळंदी (मध्यम) ही चार धरणे आहेत. यातील सारीच धरणे भरली आहेत. त्यामुळे यंदा नाशिककरांची पाणी चिंता मिटली आहे. दुसरीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणारे इगतपुरी तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण भरले आहे. त्यामुळे तूर्तास मुंबईकरांचाही पाणीप्रश्न मिटला आहे. वैतरणा धरण गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये भरले होते. यावर्षी त्याला भरण्यासाठी एक महिन्याचा उशीर लागला.

अजून पावसाची शक्यता

महाराष्ट्रातून काढता पाय घेतलेला मान्सून मध्य व दक्षिण भारतात आणखी काही दिवस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पुन्हा 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जवळपास 25 ऑक्टोबर नंतर पावसाळी वातावरण हटण्याचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्याकडे यंदा सुरुवातीच्या काळात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे धरणे तळाला गेली. शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले. मात्र, सप्टेंबर महिन्यात लावलेल्या जोरदार हजेरीने त्याने सारी कसर भरून काढली. मनमाड, नांदगाव परिसरात दोन दोनदा ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाली. यंदा नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आला. या पावसाने जिल्ह्यातील गंगापूर धरण समूह भरला आहे.

इतर बातम्याः

Special report: घावली मुळमायेची मुळी, नारोशंकरांनी मागे पाहिले अन् माता गोदापात्रात थांबली; राजेबहाद्दरांच्या देवीची रोमहर्षक आख्यायिका!

दसऱ्यानिमित्त विशेष सोय: नाशिकमध्ये आज सुट्टी दिवशीही रजिस्ट्री, वाहन नोंदणी सुरू; ही कार्यालये आहेत उघडी!