Cyclone Shakti Alert : महाराष्ट्रावर घोंगावतंय तिहेरी संकट, मोठं वादळ येणार,मुंबईसह या जिल्ह्यांना धोका

शक्ती चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात 3 ते 7 ऑक्टोबर दरम्यान मोठा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा तीव्र होत असल्याने मुंबई, ठाणे, पालघरसह किनारपट्टीवरील जिल्ह्यांना मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याचा फटका बसणार आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.

Cyclone Shakti Alert : महाराष्ट्रावर घोंगावतंय तिहेरी संकट, मोठं वादळ येणार,मुंबईसह या जिल्ह्यांना धोका
Cyclone Shakti Alert
| Updated on: Oct 04, 2025 | 8:26 AM

गेल्या काही दिवसांपासून देशभरासह महाराष्ट्रातील अनेक भागांना, जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं आहे. ऑक्टोबर सुरू झाला तरी पाऊस परतण्याची काही चिन्ह दिसत नसून अजूनही काही ठिकाणी पावसाचा धूमाकूळ सुरूच आहे. नवरात्र संपून आता दिवाळीचे वेध लागले तरी हवामानाचा लहरी कारभार अद्याप कायम असून येत्या काहीव दिवसांत तर महाराष्ट्रावर मोठं वादळ घोंगावत आहे. हवामाना विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीतील कमी दाबाचा पट्टा तीव्र होत असतानाच आता गुजरातजवळ अरबी समुद्रातही आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याची तीव्रता वाढताना दिसत असून महाराष्ट्रालाही फटका बसू शकतो. महाराष्ट्रावर सध्या ‘शक्ती’ चक्रीवादळाचे (Cyclone Shakti) मोठे संकट घोंगावत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना ‘शक्ती’ चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांना धोका

मिळालेल्या माहितीानुसार, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ‘शक्ती’ चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला असून त्यांना फटका बसू शकतो. दिनांक 3 ते 7 ऑक्टोबर दरम्यान उच्च ते मध्यम चक्रीवादळ प्रभावी असू शकते, त्याच पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे. शक्ती चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणे,पालघर, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या जिल्ह्यांना फटका बसू शकतो, त्यामुळे त्यांना इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील सर्व नागरिकांना जपून राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे असे प्रशासनाकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे. शक्ती वादळामुळे महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर पूर्व विदर्भ व मराठवाड्यातील काही भागांत देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या भागांना पावसाचा जोरदार फटका बसू शकतो.

 

हे चक्रीवादळ 3 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर 2025 पर्यंत प्रभावी असू शकते. या वादळाची तीव्रता सध्या कमी ते मध्यम (Low to Moderate) स्तरावर आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील जिल्ह्यांवर याचा परिणाम होऊ शकतो. तसेच 3 ते 5 ऑक्टोबर दरम्यान 45 ते 55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतील. एवढंच नव्हे तर ताशी 65 किमी पर्यंत सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे,पालघर, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला असून गरज असेल तरच बाहेर पडावे, जपून रहा असा इशारा या जिल्ह्यांतील नागरिकांना देण्यात आल्याचे समजते.

राज्यात तिहेरी संकट 

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होणार असून, हवामान विभागाकडून देशातील जवळपास 14 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे, यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे.

भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा कमी दबाचा पट्टा निर्माण झाला आहे, एक पश्चिमेकडे आणि दुसरा पूर्वेकडे असे दोन कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये आता भारतीय हवामान विभागाकडून (IMD) अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, महाराष्ट्रात देखील पुढील काही दिवस पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे..