‘वायू’ वादळाचा फटका, चीनच्या 10 बोटी भरकटून रत्नागिरी किनारी
वायू वादळामुळे कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळामुळे चीनच्या दहा बोटी भरकटल्या आहेत.
रत्नागिरी : भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात वायू चक्रीवादळ घोंघावत आहे. या वादळामुळे कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळामुळे चीनच्या दहा बोटी भरकटल्या असूनत्या थेट रत्नागिरीच्या बंदरात दाखल झाल्या आहेत. भारतीय तटरक्षक दलाने याबाबतची माहिती दिली आहे.
वायू वादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ताशी 90 ते 100 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच अरबी समुद्राच्या जवळील उत्तर पूर्व भागात ताशी 115 किमी वेगानेही वारे वाहू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
वायू वादळामुळे राज्यात जोरदार वारे वाहत आहे. या वादळामुळे चीनमधील दहा बोटी भरकटल्याने कोकण किनारपट्टीवर दाखल झाल्या आहेत. भारतीय तटरक्षक दलाने या दहा जहाजांना सुरक्षा रक्षकांच्या देखरेखीत ठेवण्यात येणार आहे. हे वादळ ओसरल्यानंतर या बोटी पुन्हा चीनकडे सुपूर्द करणार असल्याची माहिती भारतीय तटरक्षक महानिरीक्षक के आर सुरेश यांनी दिली आहे.
आज (12 जून) सकाळपासूनच मुंबई, ठाणे, पालघर या परिसरात वारे वाहत आहेत, त्यामुळे राज्यात वायू वादळाचे परिणाम दिसत असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळत आहे. त्याशिवाय वायू चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या ठिकाणी 30-40 किमी वेगाने विजेच्या कडकडाटासह वादळी वारे वाहत आहे. त्यामुळे समुद्रही खवळणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.
या वादळी वाऱ्यामुळे रस्त्यालगतची झाडे उन्मळून पडण्याची शक्यता आहे. किनाऱ्याजवळील घरांना आणि कच्च्या बाधंकामांनाही यामुळे धोका आहे. अशी बांधकामं पडू शकतात, विजेचे खाबं उखडून ताराही गळून पडण्याची शक्यता आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. अनेक पर्यटक अलिबागसह रायगड आणि कोकणातील विविध समुद्र किनारी पर्यटनाला गेलेली असून त्यांनाही काळजी घेण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय मच्छिमारांनाही दोन दिवस मासेमारी न करण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
गुजरातमध्ये शाळांना सुट्टी
तर उद्या (13 जून) गुजरातमध्ये वायू चक्रीवादळ धडकणार आहे. तसेच येत्या 24 तासात हे वादळ अधिक गतीमान होणार आहे. गुजरातच्या वेरावलजवळच्या किनारपट्टीवर हे वादळ धडकू शकतं असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी 13 ते 15 जूनपर्यंत राज्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.