‘महायुतीचा धर्म जो पाळणार नाही त्याचे…’, दादा भुसे यांचं मोठं वक्तव्य

"ही लोकं आधी बोलायचे हे असंविधानिक, तसेच घटनाबाह्य सरकार आहे. आता तेच लाडकी बहीण योजना आली तर पंधराशे नाही तर दहा हजार रुपये दिले पाहिजे, असे म्हणतात. पंधराशे रुपये कुठून देणार? असा प्रश्न उपस्थित करतात आणि हेच महाभाग दहा हजार रुपये दिले पाहिजे, अशी मागणी करतात", अशी टीका दादा भुसे यांनी केली.

महायुतीचा धर्म जो पाळणार नाही त्याचे..., दादा भुसे यांचं मोठं वक्तव्य
दादा भुसे
Image Credit source: tv9
Chetan Patil | Updated on: Jul 28, 2024 | 9:33 PM

शिवसेना शिंदे गटाकडून पाचोरा भडगाव विधानसभेसाठी निरीक्षक म्हणून मंत्री दादा भुसे यांची नियुक्ती झाली आहे त्यानुसार आज दादा भुसे यांनी पाचोरा भडगाव मतदारसंघात आढावा घेत कार्यकर्त्यांसोबत मेळावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. “आम्हाला महायुतीत सन्मानपूर्वक जागा मिळतील”, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यावर दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “विधानसभेच्या जागा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्रित बसून जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल आणि त्या निर्णयानुसार आम्ही पुढे मार्गक्रमण करू”, अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी दिली. यावेळी दादा भुसे यांना पाचोरा विधानसभेतील भाजपच्या बंडखोरीबाबत प्रश्न विचारला असता, “लोकसभेमध्ये ज्या पक्षाच्या उमेदवाराला जागा मिळाली त्या पक्षाच्या उमेदवारासाठी इतर महायुतीतील घटक पक्षांनी काम केलं. तोच नियम आता विधानसभेत सुद्धा साहजिकच लागू आहे. हा नियम जो पक्ष पाळणार नाही त्याचे वरिष्ठ गंभीर दखल घेतील”, असंदेखील दादा भुसे यावेळी म्हणाले.

“मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय हा विधानसभा तसेच विधान परिषदेमध्ये झालेला आहे. अनेकांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं. मात्र त्याला स्थगिती देण्यात आलेली नाही. जो निर्णय झाला त्यानुसार मराठा समाजा तरुणांना नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ सुद्धा मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाखोंच्या संख्येने यंत्रणा कामाला लावून मराठा आरक्षणा संदर्भात अहवाल तयार केलेला आहे. कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो शब्द दिला आहे त्यावर ते ठाम आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिलेला आहे तो पाळण्यासाठी त्या पद्धतीने मार्गक्रमण सुरू असून काम प्रगती पथावर आहे. ओबीसीमध्ये सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्या, या संदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीला महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि नेते हजर राहिले नाहीत”, असं दादा भुसे म्हणाले.

दादा भुसे राज ठाकरे यांच्याबद्दल काय म्हणाले?

यावेळी दादा भुसे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवरही प्रतिक्रिया दिली. “राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांची स्वतंत्र विचारधारा आहे. आता निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या पक्षाने काय करायचं हा त्यांच्या अधिकार आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, समविचारी जे लोक असतील त्यांनी सोबत काम करायला पाहिजे. त्यात राज ठाकरे देखील असू शकतात, असं मला वाटतं”, अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी दिली.

दादा भुसे लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाले?

दादा भुसे यांनी लाडकी बहीण योजनेवरुन विरोधकांवर निशाणा साधला. “ही लोकं आधी बोलायचे हे असंविधानिक, तसेच घटनाबाह्य सरकार आहे. आता तेच लाडकी बहीण योजना आली तर पंधराशे नाही तर दहा हजार रुपये दिले पाहिजे, असे म्हणतात. पंधराशे रुपये कुठून देणार? असा प्रश्न उपस्थित करतात आणि हेच महाभाग दहा हजार रुपये दिले पाहिजे, अशी मागणी करतात. लोकांमध्ये अफवा आणि संभ्रम निर्माण करण्यामध्ये लोकसभेला ते यशस्वी झाले. मात्र आता विधानसभेमध्ये ते यशस्वी होणार नाहीत आणि जनता सुद्धा त्यांना थारा देत नाही. जनतेला पण माहिती आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींना पण माहिती आहे की काय शक्य आहे आणि काय अशक्य आहे. लाडक्या बहीण योजनेसाठी संपूर्ण पैशांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि रक्षाबंधनाला भाऊबीजची भेट मुख्यमंत्री देतील”, असं दादा भुसे म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us