Nashik| अवकाळी पावसाने द्राक्ष बागांवर संकटाची बरसात; शेतकऱ्यांची झोप उडाली!

सध्या द्राक्ष बागा फ्लॉवरिंग आणि दोडा अवस्थेत आहेत. त्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष घडांमध्ये पाणी साचले आहे. त्यांनी ओलावा पकडून ठेवलाय. त्यामुळे गळ आणि कुजेच्या समस्येने शेतकरी हैराण झालेत.

Nashik| अवकाळी पावसाने द्राक्ष बागांवर संकटाची बरसात; शेतकऱ्यांची झोप उडाली!
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागा अवकाळी पावसामुळे संकटात आहेत.
| Edited By: | Updated on: Nov 22, 2021 | 4:23 PM

नाशिकः गेल्या आठ दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण आणि मध्येच होणारी बरसात. यामुळे द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. हातातोंडाशी आलेले पीक बाजारपेठेत व्यवस्थित जाणार का, याचीच चिंता त्यांना सतावते आहे.

फ्लॉवरिंग, दोडा अवस्था

सध्या द्राक्ष बागा फ्लॉवरिंग आणि दोडा अवस्थेत आहेत. त्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष घडांमध्ये पाणी साचले आहे. त्यांनी ओलावा पकडून ठेवलाय. त्यामुळे गळ आणि कुजेच्या समस्येने शेतकरी हैराण झालेत. तालुक्यात जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के बागांमध्ये हा प्रश्न गंभीर झाला आहे. द्राक्ष पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. त्यासाठी रासायनिक खते, फवारणी, औषधी आणि मजुरांची वाढलेली मजुरी. त्यात पीक बाजारपेठेत जाईपर्यंत त्याचे काय होईल याची चिंता वेगळीच. सध्या सुरुवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यात तर अतिवृष्टीच्या संकटाची मालिका सुरू होती. त्यामुळे खरिपाचे प्रचंड नुकसान झाले. आता दिवाळीनंतर तरी दिलासा मिळेल अशी आशा होती. मात्र, ती फोल ठरताना दिसत आहे. कारण सतत अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष शेतकरी संकटात सापडला आहे.

इगतपुरीत संततधार

इगतपुरीत आज सोमवारी दुपारी संततधार पावसाने तासभर हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. इगतपुरीसह घोटी, धामणगाव, मुकणे, बेलगाव तरहाले, धामनी, पाडळी, सर्वतीर्थ टाकेद आदी परिसरातही पावसाचा जोरदार हजेरी लावली. या अचानक आलेल्या पावसाने इगतपुरीकरांची तारांबळ उडाली. काल रात्रीही जोरदार पावसाने हजेरी लावली होती. पहाटेपासून त्याने विश्रांती घेतली होती. मात्र, आज पुन्हा त्याने हजेरी लावली. शहरात गेले दोन दिवस झाले ढगाळ वातावरण आहे. उकाड्याने नागरिक हैराण आहेत.

थंडी गायब

दिवाळीनंतरही पाऊस सुरू आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून थंडी जवळपास गायब झाल्यात जमा आहे. आता नोव्हेंबर महिना संपत आला. तरीही थंडी सुरू नाही. त्यामुळे हा ऋतूच गायब होतो की काय, अशी शंका निर्माण झाली. हवामान तज्ज्ञ मात्र हा हवामान बदलाचा परिणाम असल्याची भीती व्यक्त करत आहेत. येणाऱ्या काळात ऋतूचक्र असेल बदलले राहील. त्यामुळे पर्यावरण जतनासाठी साऱ्यांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

इतर बातम्याः

ST Strike| पवार-परबांची साडेचार तास बैठक; कोणताही ठोस निर्णय नाही, संपाचा तिढा कायम!

घरचं झालं थोडं…म्हणे विनाहेल्मेट दुचाकीचालकांची 10 गुणांची परीक्षा; नाशिक पोलिसांचा निर्णय