CJP Protest : सीजेपी आंदोलकांवर कारवाई होणार की नाही? फडणवीस यांचा पोलिसांना तातडीचा आदेश, तत्काळ….

महाराष्ट्रात विद्यार्थ्यांचे आंदोलन काळात दाखल गुन्हे रद्द करण्याचे आदेश

CJP Protest : सीजेपी आंदोलकांवर कारवाई होणार की नाही? फडणवीस यांचा पोलिसांना तातडीचा आदेश, तत्काळ....
devendra fadnavis and cjp protest
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 28, 2026 | 4:29 PM

CJP Protest : दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनामुळे देश ढवळून निघाला. नीट पेपरफुटीला विरोध म्हणून हे आंदोलन उभे राहिले होते. याच आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. सीजेपीच्या या लढ्याला समर्थन म्हणून महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी तरुणांनी आंदोलन केले. या आंदोलनात काही ठिकाणी पोलिसांनी बळाचा वापर केला तर काही ठिकाणी तरुणांवर गुन्हे दाखल केले. परंतु आंदोलन मागे घेण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्याही आंदोलकावर देशात कारवाई केली जाणार नाही, गुन्हा दाखल होणार नाही, असे आश्वासन दिले होते. हीच बाब लक्षात घेता महाराष्ट्रातही याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिसांना तातडीचे निर्देश दिले आहेत.

सीजेपीने नेमका काय आरोप केला होता?

सीजेपीने आपले दिल्लीतील आंदोलन मागे घेतले. परंतु याच सीजेपीने पत्रकार परिषद घेत अनेक भाजपाशासित राज्यांत आमच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांवर, आंदोलनात सहभागी झालेल्यांवर कारवाई केली जात आहे, असा आरोप केला होता. या आरोपांबाबत सविस्तर बोलण्यासाठी सीजेपीने एक पत्रकार परिषदही आयोजित केली केली होती. यावेळी सरकारने संपूर्ण देशात अनेक ठिकाणी सुरू असलेली कारवाई मागे न घेतल्यास आम्ही पुन्हा आंदोलन उभे करू. पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू, असा थेट इशाराच सीजेपीने दिला होता. त्यामुळे केंद्र सरकार नेमकं काय करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. आम्ही कोणत्याही आंदोलकावर गुन्हा दाखल करणार नाही, असे लेखी आश्वासन केंद्र देणार असल्याचा दावा सीजेपीने केला होता.

महाराष्ट्रात आंदोलकांवर कारवाई होणार की नाही?

दरम्यान, महाराष्ट्रातही मुंबई, पुणे, नागपूर तसेच इतरही शहरांत सीजेपीच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले होते. काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यातही घेतले होते. आता अशा काही आंदोलकांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. परंतु महाराष्ट्रात विद्यार्थ्यांवर आंदोलन काळात दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हा आदेश दिलाय. त्यामुळे आता महाराष्ट्रातसुद्धा गुन्हे मागे घेतले जाणार आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us