Devendra Fadnavis : आमचं हैदराबाद नाही तर मिशन मुंबई, आगामी निवडणूक रणनीतीबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

आगामी निवडणूक आणि जागावाटपाबाबत भाजपा आणि शिंदे गटाचा फॉर्म्युला ठरल्याबाबत ते म्हणाले, की आम्ही जागा किती लढवायच्या ते तुम्ही ठरवू नका, तुम्ही पंतगबाजी करू नका, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis : आमचं हैदराबाद नाही तर मिशन मुंबई, आगामी निवडणूक रणनीतीबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस
Image Credit source: tv9
| Updated on: Sep 07, 2022 | 1:15 PM

पुणे : आमचे मिशन भारत इंडिया आहे. बारामती महाराष्ट्राच्या बाहेर नाही. मिशन महाराष्ट्र अंतर्गत बारामती आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. आजचा माझा दौरा राजकीय नाही. राजे उमाजी नाईक यांना मानवंदना देण्यासाठी जात आहे. रामोशी समाजासाठी आमचे सरकार नव्या योजना घेवून येवू इच्छित आहे. त्या पार्श्वभूमीवर संवाद साधण्यासाठी जात आहे, असे ते यावेळी म्हणाले. भाजपाने बारामती (Baramati) जिंकण्यासाठी रणनीती आखली आहे. काल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीचा दौरा केला होता. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यादेखील बारामती दौरा करणार आहेत. भाजपाच्या या मिशन बारामतीविषयी विचारले असता ते बोलत होते. प्रत्येक निवडणूक शेवटची समजून लढल्यास यश नक्की मिळते, असे ते म्हणाले होते.

‘चिन्ह गोठवण्याच्या मागणीविषयी माहिती नाही’

शिवसेना-शिंदे गटाच्या वादावर सुप्रीम कोर्टात 27 सप्टेंबरला निर्णय होणार आहे. त्याविषयी ते म्हणाले, की सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आली आहे का, याबाबत मला माहिती नाही. तुम्ही मला सांगत आहात, त्यानंतरच हे समजले. सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत जबाबदारीने बोलले पाहिजे. मला या विषयाची माहिती नाही. माहिती घेऊन बोलणार, असे म्हणत असतानाच कोर्टात केस असताना बोलणे योग्य नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

‘त्यांच्या जागेवर आम्ही कशाला दावा करणार?’

आमच्यासोबत ओरिजिनल शिवसेना आहे. शिंदे साहेबाची शिवसेना आमच्यासोबत आहे. त्यांचे जे लोक आमच्यासोबत आले आहेत, त्यांच्या जागेवर आम्ही कशाला दावा करणार, असा सवाल त्यांनी केला. उरलेली शिल्लक सेना असेल तर शिंदे साहेब, आम्ही ठरवू, कल्याण लोकसभेच्या जागेवरून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. श्रीकांत शिंदे यांच्या जागेवर भाजपा दावा करत असल्याच्या चर्चांवर त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.

‘पंतगबाजी करू नका’

आगामी निवडणूक आणि जागावाटपाबाबत भाजपा आणि शिंदे गटाचा फॉर्म्युला ठरल्याबाबत ते म्हणाले, की आम्ही जागा किती लढवायच्या ते तुम्ही ठरवू नका, तुम्ही पंतगबाजी करू नका, आमचे हैदराबाद नाही तर मिशन मुंबई आहे, असेही ते म्हणाले.