राज्यात आता कृत्रिम पाऊस पडणार? बडा मंत्री म्हणाला मुख्यमंत्री निर्णय…दिली महत्त्वाची माहिती!
आम्हाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. नेतेमंडळी शेतीच्या बांधावर गेल्यानंतर शेतकरी आपली व्यथा मांडत आहेत. दरम्यान आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यात कृत्रिम पाऊस पाडावा, त्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी केली जातेय. आता यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

रवी लव्हेकर, टीव्ही 9 मराठी, सालोपूर : सध्या राज्यात दुष्काळाने डोके वर काढलेय. कृषीमंत्री सध्या राज्यभर दौरा करून हातातून गेलेल्या पिकाची पाहणी करत आहेत. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यातील इतरही भागात दुष्काळाची ही स्थिती गंभीर बनली आहे. काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील उभे पीक काढून टाकले आहे. आम्हाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली जात आहे. नेतेमंडळी शेतीच्या बांधावर गेल्यानंतर शेतकरी आपली व्यथा मांडत आहेत. दरम्यान आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यात कृत्रिम पाऊस पाडावा, त्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी केली जातेय. आता यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
अंतिम निर्णय घ्यायचा अधिकार…
कृत्रिम पावसाचे जे काही प्रयत्न झाले, त्याला महाराष्ट्रात आजपर्यंत यश आलेले नाही. तरीदेखील राज्यात मात्र कृत्रिम पाऊस पाडायचा का नाही याबाबतचा अंतिम निर्णय घ्यायचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे, असे महत्त्वाचे भाष्य जयकुमार गोरे यांनी केले. तसेच सध्या पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सातारा अशा जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा असल्याने काही अंशी शेतीचा प्रश्न मिटला आहे. तरीही उजनी सारख्या धरणाच्या पाण्यातून सोलापूर जिल्ह्याला पुढील एक वर्षभराचे नियोजन करावे लागणार असल्याचे मत सोलापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.
आवश्यक तिथे सर्व उपायोजना करणार
सध्या सोलापूर जिल्ह्यात 50 टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. उद्याच आपण टंचाईची बैठक घेऊन जिथे जिथे टँकर लागतील, जनावरांना पाण्यासाठीच्या व्यवस्था लागतील तिथे सर्व आवश्यक उपाययोजना करणार असल्याचेही यावेली गोरे यांनी सांगितले. तसेच उजनी धरण सध्या भरले आहे. याच धरणाच्या पाण्यावर पिण्याच्या पाण्याच्या, शेतीच्या जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटतो. पाऊस पुढच्या वर्षी जून महिन्यात पडेल. त्यामुळे उजनीचे पाणी एक वर्षभर पुरवण्याचे नियोजन प्रशासनाला करावे लागणार असल्याचे यावेळी पालकमंत्री गोरे यांनी सांगितले. दरम्यान, आता जयकुमार गोरे यांनी सांगितल्यानुसार राज्यात कृत्रिम पाऊस पाडायचा की नाही याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत. भविष्यात याबाबत सकारात्मक निर्णय होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.