धनंजय मुंडेंनी 10 जणांना संपवलं, त्यांच्या बंगल्यावरुन…; महादेव मुंडे हत्याकांडाला नवं वळण, कुणी केला आरोप?

परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजाभाऊ फड यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नार्को टेस्टच्या रिपोर्टनंतर धनंजय मुंडेंना आरोपी करण्याची मागणी होत आहे.

धनंजय मुंडेंनी 10 जणांना संपवलं, त्यांच्या बंगल्यावरुन...; महादेव मुंडे हत्याकांडाला नवं वळण, कुणी केला आरोप?
Dhananjay Munde
| Updated on: Mar 06, 2026 | 1:26 PM

परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला आता एक नवीन वळण लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ फड यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनी आजवर परळीतील दहा लोकांना संपवले. त्यामुळे त्यांना या प्रकरणात आरोपी करा, अशी मागणी राजाभाऊ फड यांनी केली आहे. याला धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत राजाभाऊ फड यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे.

परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचा २० ऑक्टोबर २०२३ रोजी परळीतील तहसील कार्यालयासमोर निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या प्रकरणी मुंडे कुटुंबाकडून सातत्याने चौकशीची मागणी केली जात आहे. मात्र अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यातच काही दिवसांपूर्वी महादेव मुंडे यांच्या नार्को टेस्टचा रिपोर्ट एसआयटीच्या हाती आला आहे. या ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट रिपोर्टमधून महादेव मुंडे हत्या प्रकरणाचं सत्य लवकरच समोर येणार आहे. आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळीतील नेते राजाभाऊ फड यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.

महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून फोन आल्याने थांबला गेला होता. आता या प्रकरणातील संशयित असलेल्या लोकांच्या ब्रेन मॅपिंग व नार्को टेस्ट झाल्या आहेत. त्यामध्ये जे काही समोर आले आहे ते जाहीर करावे. तसेच या प्रकरणात धनंजय मुंडे यांना 120 ब कलमाप्रमाणे आरोपी करावे, अशी मागणी राजाभाऊ फड यांनी केली आहे.

धनंजय मुंडे यांनी आजवर परळीतील दहा लोकांना संपवले आहे. त्यांची नावे देखील आमच्याकडे आहेत. आजवर हे कुठल्याही खून प्रकरणाचा तपास होऊ देत नव्हते. महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झाला असता तर बापू आंधळे व संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलेच नसते, असा दावाही राजाभाऊ फड यांनी केला आहे.

महादेव मुंडे यांच्या प्रकरणात संशयित असलेल्या लोकांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यानुसार कारवाई करावी. अन्यथा येत्या 20 मार्च नंतर आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरु, असा इशारा राजाभाऊ फड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे. आता दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप झाल्यानंतर त्यांच्या खंदे समर्थकांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

अब्रू नुकसानीचा दावा करणार

राजाभाऊ फड यांनी जे आरोप केले आहेत, त्यांच्याकडे काय पुरावा आहे. ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट झाली आहे, त्याचा रिपोर्ट आला आहे. ते धनंजय मुंडे यांचे नाव घेत आहे. त्याची किती बालिश बुद्धी आहे, किती अज्ञानी माणूस आहे. आम्ही कायदेशीर मार्गाने पुढची प्रक्रिया करु. स्वतःला प्रसिद्धीसाठी या विरोधकाचं काय काम आहेत. कुठल्या गावात त्यांनी काम केलं आहे, हे त्यांनी दाखवावं. जनतेसाठी त्यांचे काय योगदान आहे. आम्ही याप्रकरणी लोकशाही व कायदेशीर मार्गाने सल्ला घेऊन त्यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा करणार आहोत किंवा गुन्हा दाखल करता येईल हे बघू, असे धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी सांगितले.

राजकीय सूडबुद्धीने आरोप करणे चुकीचे

एसआयटीचा रिपोर्ट अद्याप बंद लिफाफ्यात असताना फड यांना त्यातील माहिती कशी मिळाली? हा केवळ लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. जेव्हा जेव्हा धनंजय मुंडे यांचे नाव मंत्रिपदासाठी किंवा मोठ्या राजकीय जबाबदारीसाठी समोर येते, तेव्हा अशा पद्धतीच्या अफवा पसरवून मुख्यमंत्री आणि सरकारवर दबाव निर्माण केला जातो. कुठल्याही पुराव्याशिवाय नेत्याची बदनामी केल्याबद्दल आम्ही गप्प बसणार नाही. कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही राजाभाऊ फड यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहोत. आम्हालाही महादेव मुंडे यांच्या हत्येचा छडा लागावा असे वाटते, पण तपासाच्या नावाखाली राजकीय सूडबुद्धीने आरोप करणे चुकीचे आहे, असेही या समर्थकांनी म्हटले.

Follow Us