औरंगाबादेत भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट, नेमकं घडलं काय?

| Updated on: Dec 11, 2020 | 8:05 PM

औरंगाबादेत भाजप कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापट झाली (Dispute between BJP workers and police in Aurangabad).

औरंगाबादेत भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट, नेमकं घडलं काय?
Follow us on

औरंगाबाद : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ औरंगाबादेत भाजप कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केलं. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. औरंगाबादेतील क्रांती चौकात हे आंदोलन सुरु होते. यावेळी आंदोलकांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने ही झटापट झाल्याची माहिती समोर आली आहे (Dispute between BJP workers and police in Aurangabad).

क्रांती चौकात भाजप कार्यकर्त्यांचे निदर्शने सुरु होती. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याविरोधात निषेध आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांच्या हातात ममता बॅनर्जी यांचा प्रतिकात्मक पुतळा होता. आंदोलन सुरु असताना पोलीस तिथेच उपस्थित होते. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी ममता यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी महिला पोलिसांची संख्या कमी होती.

भाजपच्या महिल्या कार्यकर्त्या पुतळा जाळण्याच्या प्रयत्नात असतानाच एक महिला पोलीस त्यांच्या झुंडीत शिरली. या महिला पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांच्या हातातून पुतळा काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भाजपच्या इतर कार्यकर्त्यांनी पुतळा हिसकवण्याचा प्रयत्न केला. यावेळी घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या हातातून पुतळा काढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात झटापट झाल्याचं दृश्य पाहायला मिळालं.

पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या हातातून अखेर पुतळा काढून घेतला. पोलिसांनी तो पुतळा बाजूला ठेवला. पोलिसांसोबत झटापट झाल्याने काही काळ परिसरात तणावाचं वातावरण होतं. मात्र, त्यानंतरही भाजप कार्यकर्त्यांनी आपलं आंदोलन सुरुच ठेवलं. कार्यकर्त्यांकडून निदर्शने सुरु होती (Dispute between BJP workers and police in Aurangabad).

मुंबईतही भाजप आक्रमक

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हल्ल्याचे मुंबईतही तीव्र पडसाद उमटले. भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत या हल्ल्याचा निषेध नोंदवला. सायन येथे भाजप कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत रास्तारोको केला. त्यामुळे सायन येथे वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी आंदोलकांनी संपूर्ण राज्यात आंदोलन करण्याचा इशाराही दिला

संबंधित बातम्या:

PHOTO | नड्डांच्या ताफ्यावर दगडफेक, भाजप टीएमसीचं गुंडाराज संपवून सत्तेत येणार: नड्डा

इंधन दरवाढीचा भडका, शिवसैनिक गॅस सिलिंडर घेऊन रस्त्यावर; मुंबईत जोरदार आंदोलन

पश्चिम बंगाल : जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक, वाहनांची तोडफोड, टीएमसी कार्यकर्त्यांवर आरोप