Ramdas Athawale: हरण्यासाठी निवडणूक लढवू नका; रामदास आठवले यांचं संभाजी छत्रपतींना आवाहन

| Updated on: May 21, 2022 | 6:50 PM

Ramdas Athawale: कोणाशीही चर्चा न करता संभाजीराजेंनी निवडणूक लढवण्याचे जाहीर करणे योग्य नाही. विनाकारण हरण्यासाठी त्यांनी निवडणूक लढवू नये.

Ramdas Athawale: हरण्यासाठी निवडणूक लढवू नका; रामदास आठवले यांचं संभाजी छत्रपतींना आवाहन
संभाजी छत्रपतींनी विनाकारण हरण्यासाठी निवडणूक लढवू नये; रामदास आठवले यांचं आवाहन
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नांदेड: स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी राज्यसभेची निवडणूक  (rajyasabha election) अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजी छत्रपती यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. तर, शिवसेनेने संभाजीराजेंना पाठिंब्यासाठी पक्षात प्रवेश करण्याची अट घातली आहे. संभाजी छत्रपती यांनी मात्र आपल्याला महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे ठेवला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. संभाजीराजेंच्या उमेदवारीचं भिजत घोंगड असतानाच अपक्ष निवडणूक लढली तरच पाठिंबा देऊ असं भाजपने म्हटलं आहे. त्यामुळे संभाजीराजे यांची चोहेबाजूंनी कोंडी झालेली असतानाच रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनी विनाकारण हरण्यासाठी निवडणूक लढवू नका, असं आवाहन संभाजीराजेंना केलं आहे. त्यामुळे आता संभाजीराजे या निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

रामदास आठवले आज नांदेडमध्ये होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. कोणाशीही चर्चा न करता संभाजीराजेंनी निवडणूक लढवण्याचे जाहीर करणे योग्य नाही. विनाकारण हरण्यासाठी त्यांनी निवडणूक लढवू नये. भाजपा संभाजीराजेंना उमेदवारी देणार नाही. भाजपच्या 3 जागा निवडून येतील एवढी मते भाजपकडे आहेत, असे रामदास आठवले यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

आधी माफी मागा, मग जा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा स्थगित केला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केला त्यांचे स्वागत आहे. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली असती. राज ठाकरे यांनी अगोदर उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि नंतर अयोध्येला दर्शनासाठी जावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

दोघांनीही एकत्र यावं

आठवले यांनी पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीवर भाष्य केलं आहे. शिवसेना हा मोठा पक्ष आहे. त्यांनी वादात न पडता अडीच अडीच वर्षाच्या फॉर्मुल्यावर भाजपसोबत एकत्र यावे. कोणाचे हिंदुत्व अधिक कट्टर यासाठी दोघा भावात स्पर्धा सुरू आहे. या प्रश्नावर बोलताना आठवले यांनी ही प्रतिक्रीया दिली.

मीच त्यांना चक्रव्यूहातून काढू शकतो

शिवसेनेपेक्षा भाजपच हिंदू हिताची आहे. शिवसेना ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या चक्रव्यूहात अडकलीय. त्यांना या चक्रव्यूहातून मीच बाहेर काढू शकतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.