
परप्रांतीय प्रियंका चतुर्वेंदींना संधी तर संभाजीराजेंना का नाही? राज्यसभेवरून मराठा समाज आक्रमक
Image Credit source: tv9
मुंबई : भाजप खासदार संभाजीराजे (Chatrapati Sambhajiraje) यांच्या खासदारकीचं गणित अजूनही ठरत नाही. त्यांना पाठिंबा मिळावा यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav Thackeray) यांची नुकतीच भेट घेतली आहे. त्यांना शिवसेनेकडून लढण्याची अट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातल्याची माहिती विश्वनीय सुत्रांनी दिली आहे. तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी अपक्ष लढण्याची अट भाजपकडून (BJP) घालण्यात आल्याचीही माहिती सुत्रांनी दिलीय. त्यामुळे आता संभाजीराजे शिवसेनकडून लढणार की अपक्षच लढणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. संभाजीराजेंच्या उमेदवारीसाठी काही मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. परप्रांतीय असून शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेंदी यांना संधी मिळते तर संभाजीराजेंना का नाही मिळू शकत? असा सवाल आता संघटनांकडून करण्यात येतोय. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता काही वेगळा निर्णय घेणार का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
संभाजीराजे-मुख्यमंत्री बैठकीत काय घडलं?-सूत्र
- संभाजीराजेंनी अपक्ष उमेदवारीला पाठिंबा देण्याची मागणी केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना शिवसेनेत प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे.
- शिवसेनेत प्रवेश केल्यास राज्यसभेची उमेदवारी देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी दिला. यावर संभाजीराजेंनी शिवसेनेची नाहीत तर मविआची उमेदवारी देण्याचा नवा प्रस्ताव दिला.
- मविआची उमेदवारी मिळाली तरी राज्यसभेत सेनेच्या खासदारांसोबत असण्याची अट मुख्यमंत्र्यांनी घातली. राज्यसभेत शिवसेनेच्या धोरणात्मक निर्णायावर संभाजीराजेंनी सोबत राहण्याची अटही घालण्यात आली.
मराठा समन्वयकांनी घेतली फडणवीसांची भेट
मराठा समाजातील अनेक संघटनांकडून राजेंच्या खासदारकीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. राजर्षी शाहू महाराजांच्या शताब्दी वर्षानिमित्त शाहू महाराजांचा बिनविरोध करावे, अशी मागणी, यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन राजेंना मिळावे यासाठी भेटलो, अशी माहिती मराठा नेते राजेंद्र कोढरे यांनी दिली आहे.
मविआकडून लढल्यास विजयाचा मार्ग सोपा?
- संभाजीराजेंना निवडून येण्यासाठी 42 मतांची आवश्यकता आहे.
- आपला प्रत्येकी एक उमेदवार निवडून आणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून 27 मतं शिल्लक आहेत.
- अपक्ष आमरादांची संख्या धरून मविआकडे 46 मतं शिल्लक आहेत.
- त्यामुळे मविआत आल्यास संभाजीराजेंचा विजयाचा मार्ग सोप्पा असल्याचे राजकीय जाणकारांचे सांगणे आहे.
- आता संभाजीराजे अपक्षच लढणार की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ऑफर स्वीकारत शिवसेनेकडून लढणार, हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या तरी हे सर्व चित्र अधांतरीच असल्याचे दिसून येत आहे.