Shivsena : एकनाथ शिंदे शिवसेनेच्या महिला खासदाराचा संजय राऊतांबद्दल धक्कादायक दावा, विश्वास ठेवणं कठीण
Shivsena : "हे सर्व मर्यादा ओलांडणारे प्रकार आहेत. यापूर्वीही एका व्यक्तीने आपल्या आई-वडिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या विषयावर मी येत्या अधिवेशनात प्रस्ताव आणणार आहे"

मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. ऑपरेशन टायगरमध्ये उद्धव ठाकरे गटाचे खासदार फुटणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलवली आहे. येत्या 14 जूनला म्हणजे उद्या मातोश्रीवर ही बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी, ये डर अच्छा हैं… ही भीती असली पाहिजे…असं वक्तव्य केलं आहे. ज्योती वाघमारे शिवसेनेच्या राज्यसभा खासदार आहेत. ऑपेरशन टायगरबाबत एकनाथ शिंदेंनी आपली भूमिका मांडली आहे असं त्या म्हणाल्या.
मध्यंतरी उद्धव ठाकरे गटाच्या काही खासदारांची एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली होती. यात नागेश पाटील आष्टीकर आणि खासदार संजय पाटील हे दोघे आहेत. धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर गैरहजर असल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. “ओमराजे निंबाळकर बैठकीला का उपस्थित नव्हते हे ते सांगू शकतील. पण खासदार उपस्थित राहत नाही ही बाब गंभीर आहे” असं त्या म्हणाल्या.
संजय राऊत यांच्याबद्दल धक्कादायक दावा
संजय राऊत यांच्यावर त्यांनी बोचरी टीका केली. “संजय राऊत यांना कुणी विचारत नाही, त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल की नाही ते देखील माहित नाही. ते स्वतः काँग्रेसच्या वाटेवर आहेत” असा ज्योती वाघमारे यांनी दावा केला. संजय राऊत शिवसेना सोडणार आणि काँग्रेसमध्ये जाणार यावर कोणालाही विश्वास बसणार नाही. “आमचा हिंदुत्वाचा पक्ष आहे. राऊतांच्या पक्षाने हिंदुत्व सोडलय. काँग्रेस सोबत सलगी केली आहे” असं ज्योती वाघमारे म्हणाल्या.
प्रणित मोरे वादावरही भाष्य
सध्या राज्यात गाजत असलेल्या प्रणित मोरे वादावरही त्यांनी भाष्य केलं. “हे सर्व मर्यादा ओलांडणारे प्रकार आहेत. यापूर्वीही एका व्यक्तीने आपल्या आई-वडिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या विषयावर मी येत्या अधिवेशनात प्रस्ताव आणणार आहे. आम्ही या प्रकाराचा निषेध करतो. यात महिलांचाही समावेश आहे.घाणेरडी आणि गलिच्छ वक्तव्ये करायची आणि नंतर माफी मागायची, अशी पद्धत काही जणांनी सुरू केली आहे. अशा प्रकारचे शो आयोजित केले जात आहेत” असं त्या म्हणाल्या.