Uday Samant : मी जर गोकुळ बरोबरच बोलतानाचं रेकॉर्डिंग ठेवलं असतं तर..उदय सामंत काय म्हणाले?

Uday Samant : "दबाव का आणायचा. मी त्यांना सन्मानपूर्वक विनंती केली आहे. ते माझ्या आणि गिरीश महाजन यांच्या विनंतीला मान देतील" असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.

Uday Samant : मी जर गोकुळ बरोबरच बोलतानाचं रेकॉर्डिंग ठेवलं असतं तर..उदय सामंत काय म्हणाले?
Uday Samant
| Updated on: Jun 05, 2026 | 3:07 PM

महायुती विधान परिषदेच्या 17 जागांसाठी एकत्र निवडणूक लढवत आहे. पण नाशिकमध्ये बंडखोरी झाली आहे. भाजप नेते गणेश गीते यांचे बंधु गोकुळ गीते आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यायला तयार नाहीत. त्यांनी माघार घ्यावी, यासाठी त्यांची समजूत काढण्यासाठी मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये आले आहेत. उदय सामंत यांनी या विषयावर माध्यमांशी संवाद साधला.  “नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत गणेश गीते यांनी फॉर्म मागे घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन फॉर्म मागे घेतले. गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांचे फॉर्म अजून आहेत. प्रसाद हिरे यांच्याशी मी सकाळपासून दोनदा बोललो. दादा भुसे प्रसाद हिरे यांना भेटणार आहेत” असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.

नाशिक विधान परिषदेच्या जागेसाठी बंडखोरी झाली आहे.  गोकुळ गीत यांनी माघार घ्यावी यासाठी शिवसेनेकडून उदय सामंत आणि भाजपकडून गिरीश महाजन प्रयत्न करत आहेत. “गोकुळ गीतेंना मी विनंती केली आहे. गिरीश भाऊ स्वत: जळगावहून नाशिकला आले आहेत. पुढच्या काही वेळात ते गणेश गीते आणि गोकुळ गीते यांना भेटतील. मी आशावादी आहे, सकारात्मक आहे. मला ठाम विश्वास आहे, योग्य निर्णय होईल. आमचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचं समर्थन दोन्ही सहकारी उमेदवार करतील असा मला विश्वास आहे” असं उदय सामंत बोलले.

गोकुळ गीते म्हणतात मी माघार घेणार नाही, मी भाजपमध्ये नाही. त्यावर उदय सामंत म्हणाले की, “100 टक्के मी त्यांच्या मताशी सहमत आहे. कोणी कुठल्या उमेदवारावर दबाव आणू नये. मी रेकॉर्डिंग ठेवत नाही, मी जर गोकुळ जीं बरोबरच बोलतानाचं रेकॉर्डिंग ठेवलं असतं तर मी त्यांना विनंती केली आहे” “शेवटी मी ज्या पक्षाचं नेतृत्व मानतो एकनाथ शिंदे साहेब. त्यांच्या पक्षासमोर अडचण निर्माण झाली असेल तर दबाव का आणायचा. मी त्यांना सन्मानपूर्वक विनंती केली आहे. ते माझ्या आणि गिरीश महाजन यांच्या विनंतीला मान देतील” असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.

गिरीश महाजनांचं खच्चीकरण करायचं नाही

“राजकारणात समज-गैरसमज होत असतात. ते वेळेवर दूर केले तर त्याचे परिणाम दूरगामी होत नाहीत. योग्य निर्णय होईल महायुतीला पोषक निर्णय होईल असं मला वाटतं” असं उदय सामंत बोलले. “मी प्रचंड आशावादी आहे, मी चॅलेंज केलेलं नाही की मी आल्यावर फॉर्म मागे घेतला जाईल. गिरीश भाऊंचं नाव वारंवार का घेतल, तर आपल्या माध्यमातून मी ऐकलं आहे की, गीते बंधुंनी सांगितलं की, आम्ही महाजन साहेबांचं ऐकतो. यात मला गिरीश महाजनांचं खच्चीकरण करायचं नाही किंवा त्यांना माझं खच्चीकरण करायचं नाही. आम्ही दोघे महायुतीमधले मंत्री आहोत. यातून सुवर्ण मध्य निघावा, महायुतीचा उमेदवार मोठ्या फरकाने जिंकून यावा एवढीच आमची भूमिका आहे” असं उदय सामंत म्हणाले. आता फॉर्म मागे घेता येणार नाही. पण त्यांनी आमच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा द्यावा, एवढीच आमची भूमिका आहे.

 

Follow Us