बंडखोरीचा बाण शिंदे गटातही घुसला? अयोध्या दौऱ्यात गैरहजर असलेले कोण कोण? बेदिलीची ठिणगी, शिवसेनेचा गर्भित इशारा!

हिंदुत्व, धनुष्यबाण, भगवा, खरी शिवसेना म्हणजे आम्हीच हे ठसवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून अयोध्येत मोठं शक्तिप्रदर्शन केलं. मात्र शिंदेंच्या शिवसेनेतही आता बेदिलीची ठिणगी पडलीय, असा मोठा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने केलाय.

बंडखोरीचा बाण शिंदे गटातही घुसला? अयोध्या दौऱ्यात गैरहजर असलेले कोण कोण? बेदिलीची ठिणगी, शिवसेनेचा गर्भित इशारा!
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 10, 2023 | 9:52 AM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह समर्थक आमदार, खासदारांचा अयोध्या (Ayodhya) दौरा दणदणीत पार पडला. शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या आमदार-खासदारांच्या गटालाच खरी शिवसेना असल्याची पावती निवडणूक आयोगानेही दिली आहे. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही बंडखोरीचा बाण घुसल्याची चर्चा सुरु झालीआहे. उद्धव ठाकरे समर्थित शिवसेनेकडून हा आरोप करण्यात येतोय. शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यात गैरहजर असलेल्या आमदार-खासदारांवरून आता चर्चा सुरु झाली आहे.

कोण कोण नव्हतं?

एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात शिंदे गटातील बहुतांश आमदार आणि खासदारांचा समावेश होता. मात्र कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू, तर खासदार भावना गवळी या अनुपस्थित होत्या. हे चौघं अयोध्या दौऱ्यात का शामिल झाले नाहीत, यामागे एक मोठं रहस्य असल्याचं सूतोवाच ठाकरेंच्या शिवसेनेनं केलंय.

बेदिलीची ठिणगी?

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून चार जणांच्या गैरहजेरीवरून मोठं सूतोवाच केलंय. त्यात लिहिलंय, आता मिंधे सरकारातील काही मंत्री आणि आमदार अयोध्येत गेले, पण बरेच आमदार अयोध्या यात्रेत सामील झाले नाहीत, ते महाराष्ट्रातच राहिले. श्रीरामांच्या दर्शनास जाऊ नये असे त्यांना का वाटले, हे रहस्य आहे. मिंधे गटात सरळ दोन गट पडले आहेत व उद्याच्या बेदिलीची ठिणगी अयोध्येच्या भूमीवर पडली आहे. त्यामुळे अयोध्येत उत्सव आहे की राजकीय निरोप समारंभ हे येणारा काळच ठरवेल, असा गर्भित इशाराही सामनातून देण्यात आलाय.

गैरहजेरी का?

एकनाथ शिंदे गटाचे समर्थक ३ आमदार आणि १ खासदार हे अयोध्या दौऱ्यात शामिल झाले नसल्याने चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे भाजपचे अनुभवी नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील अयोध्या दौऱ्यावर गेले. इतरही काही भाजप नेते शिंदेंच्या दौऱ्यात शामिल झाले. मात्र हे चारजण का गेले नाहीत, यावरून नवे राजकीय आडाखे बांधले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू यांचे वारंवार सरकारविरोधात करण्यात आलेली वक्तव्य, सुप्रिया सुळेंवरील टीकेवरून घेरले गेलेले अब्दुल सत्तार, यांच्यासह शहाजी बापू पाटील आणि भावना गवळी नेमक्या कोणत्या कारणामुळे अयोध्येत गेले नाहीत, हे तपासून पाहिलं जातंय. तूर्तास तरी काही वैयक्तिक कारणामुळे हे चौघं या दौऱ्यात शामिल झाले नाहीत, असं स्पष्टीकरण देण्यात आलंय.