100 युनिट वीजबिल माफी देणार असं म्हटलंच नव्हतं : ऊर्जामंत्री नितीन राऊत

| Updated on: Feb 18, 2021 | 6:20 PM

100 युनिट वीज बिल माफीबाबत एक समिती बनवली होती, असं आपण सांगितलं होतं. पण त्या समितीची बैठक झाली नाही म्हणून त्यात काहीच झालं नाही, असंही ऊर्जामंत्री राऊत यांनी म्हटलंय.

100 युनिट वीजबिल माफी देणार असं म्हटलंच नव्हतं : ऊर्जामंत्री नितीन राऊत
नितीन राऊत
Follow us on

नागपूर : 100 युनिट वीज बिल माफी देणार असं आपण सांगितलंच नव्हतं असा दावा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. तसंच 100 युनिट वीज बिल माफीबाबत एक समिती बनवली होती, असं आपण सांगितलं होतं. पण त्या समितीची बैठक झाली नाही म्हणून त्यात काहीच झालं नाही, असंही ऊर्जामंत्री राऊत यांनी म्हटलंय. ते आज नागपुरात माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ऊर्जामंत्र्यांनी आपण राज्यातील जनतेला 100 युनिट वीज माफी देण्याच्या घोषणेवर अद्यापही ठाम असल्याचं वक्तव्य 20 नोव्हेंबर 2020 रोजी केलं होतं. त्यावेळी आधी मागच्या सरकारच्या पापाचं निरसन करु, मगच 100 युनिट वीज माफ करण्याचा निर्णय घेऊ, असं राऊत म्हणाले होते.(Nitin Raut claims that he did not talk about 100 unit electricity bill waiver)

ग्राहकांना 15 दिवसांची नोटीस

चालू वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांना 15 दिवसांची नोटीस देऊन वीज खंडित केली जाणार असल्याची माहिती ऊर्जामंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे सरकार वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांना शॉक देण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनमध्ये वीजेचा वापर केला नसतानाही मोठ्या प्रमाणात वीज बिल देण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यावरुन वीज बिल भरु नका असं आवाहन विरोधकांकडून करण्यात आलं आहे. वाढीव वीज बिलाविरोधात मनसे आणि भाजपनं आंदोलनही केलं आहे. असं असलं तरी वीज बिल भरावंच लागेल असं ऊर्जामंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलंय.

‘..तर महावितरण जगणार कशी?’

महाविकास आघाडीचा शपथविधी शेतकऱ्यांच्या साक्षीनं झाला आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. भाजपचं वीज बिल आंदोलन फसवं आहे. इंधन दरवाढ, धान्य दरवाढ होत आहे. अशावेळी 10 महिने वीज बिल भरलं नाही तर महावितरण जगणार कशी? असा सवाल राऊत यांनी विचारला आहे. वीजनिर्मितीसाठी पैसे लागतात. त्यामुळे जनतेनं वीज बिल भरावं, असं आवाहन त्यांनी केलंय. तुमचं वीज बिल भरणं म्हणजे महावितरणसाठी जगण्यामरण्याचा प्रश्न असल्याचंही राऊत म्हणालेत.

‘माझ्या घरी लग्न, नियमांचं पालन करणार’

थकबाकीदार बनवण्याचं काम भाजपनं केलंय. केंद्र सरकार खासगी कंपन्यांसाठी महावितरणला खड्ड्यात घालण्याच्या तयारीत आहे. सरकारी कंपनी ही सरकारी असते. त्यात सवलती मिळतात. मात्र, खासगीकरणाचा घाट केंद्र सरकार घालत असल्याचा आरोप ऊर्जामंत्र्यांनी केलाय. तसंच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लोकांनी काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. नियमांचं पालन योग्यरित्या केलं तर चिंता करण्याची गरज नाही. माझ्या घरी लग्न आहे. त्यात मी नियमांचं पालन करणार असल्याचंही राऊत यांनी आवर्जुन सांगितलं.

संबंधित बातम्या :

कोणतीही वीज बिलं माफ होणार नाहीत; ऊर्जामंत्र्यांचा सामान्यांना शॉक

शेतकऱ्यांनी थकबाकी भरल्यास 50 टक्के वीजबिल माफी, ठाकरे सरकारचा निर्णय

Nitin Raut claims that he did not talk about 100 unit electricity bill waiver