
परभणी गंगाखेड महामार्गावरील शिंगणापूर पाटीवर शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी दोन तासांपासून शेतकऱ्यांचे रास्ता रोको सुरू आहे. शेतकरी आणि पोलिसांमध्ये जमीन मोजणीवेळी मोठी झटापट देखील झाली. यानंतर ग्रामस्थ या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलनाला बसले. यावेळी परभणी जिल्हातील अनेक मोठे नेतेही पोहोचले. शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी परभणीच्या शिंगणापूर पाटीवर सलग 3 तास शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या रास्तारोकोमध्ये खासदार संजय जाधव यांच्यासह सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या सहजपूर जवळा येथील सीमा बागल नावाच्या शेतकरी महिलेला वाढत्या तापमानामुळे भोवळ आली. यावेळी त्यांची दातखिळ ही बसल्याचं बघायला मिळालं.
सीमा बागल यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना परभणीच्या रुग्णालयात हलविण्यात आल आहे. 4 मार्च रोजी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. या आंदोलनाबद्दल बोलताना खासदार संजय जाधव यांनी म्हटले की, शेतकरी वडीलोपार्जित जमीन शक्तीपीठ महामार्गाला द्यायला तयार नाहीयेत.
शेतीवर शेतकऱ्यांची उपजीविका आहे, पैसे काय शेतकरी खाणार आहेत का? शेतकऱ्यांना आपल्या जमिनी विकायच्या नाहीत. सहजपूर जवळा येथे जमीन मोजणीवेळी शेतकऱ्यांवर अमानुष अत्याचार करण्यात आले. महसूल आणि पोलीस प्रशासनाने सहजपूर जवळ शेतकऱ्यांवर अत्याचार केले. भाजपला काही घेणं नाही देणं नाही, यांना केवळ यांचा हेतू साध्य करायचाय, अडाणी, अंबानी यांच्यासारख्या लोकांच्या मदतीने निवडणुका जिंकत आहेत.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेक भूमिका भाजपची देशात सुरू आहे. माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे यांना वेळच्यावेळी धडा शिकवा. ही संधीसाधू लोक आहेत, यांची वेळ आली की हे पायापाशी बसणार. काम संपलं की डोक्यावरून लघुशंका केल्याशिवाय राहणार नाहीत. अश्या हरामखोर लोकांना वेळीच रोखण्याची गरज निर्माण झालीय, महाराष्ट्र भरातल्या शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे.
मला असे वाटते ज्या अमानुष पद्धतीने तुम्ही वागायला लागलात त्यावरून तुम्ही जनतेच्या मतावर नाहीत तर ईव्हीएम वरूनच निवडून आलात. जनतेच्या मतावर निवडून आले असता तर तुम्ही जनतेचा मताचा आदर केला असता आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द केला असता असेही संजय जाधव यांनी म्हटले.