Ajit Pawar: मृत्यूच्या 5 दिवस आधी दादांनी मित्राकडे केले होते मनमोकळे! ‘कंटाळा आलाय’, असं का म्हणाले?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल विमान अपघातात निधन झाले आहे. निधनाच्या पाच दिवस आधी अजित दादांनी जवळच्या मित्राकडे मनमोकळे केले होते. तेव्हा ते मला सगळ्याचा कंटाळा आलाय असे म्हणाले होते.

Ajit Pawar: मृत्यूच्या 5 दिवस आधी दादांनी मित्राकडे केले होते मनमोकळे! कंटाळा आलाय, असं का म्हणाले?
Ajit Pawar
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 29, 2026 | 12:28 PM

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा बारामतीतील विमान अपघातात अकाली मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. कणखर, शिस्तबद्ध आणि अथक परिश्रम करणारे ‘दादा’ म्हणून ओळखले जाणारे अजित पवार गेल्या काही दिवसांत मात्र खूप खचलेले होते. अपघाताच्या फक्त पाच दिवस आधी त्यांनी आपल्या अत्यंत जवळचे मित्र आणि विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांच्याशी मन मोकळे केले होते.

“मला या सगळ्याचा आता कंटाळा आलाय, बस्स वाटतंय आता…” असे शब्द अजितदादांनी गुजर यांना सांगितले होते. गुजर यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितले की, त्या दिवशी दादा खूपच व्यथित आणि अस्वस्थ दिसत होते. “किरण, चला जरा बाहेर फिरूया,” असे म्हणून ते दोघे अर्धा दिवस एकत्र फिरले आणि जेवणही केले. ते जेवण दादांसोबतचे शेवटचे जेवण ठरले. दादा सतत एकच बोलत होते “बास झालं, या सगळ्या गोष्टींमुळे खूप त्रास होतोय.”

लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि त्यानंतर बारामतीत झालेली तीव्र टीका यामुळे दादांच्या मनाला खोल जखम झाली होती. गुजर यांच्या मते, दादा अतिशय संवेदनशील आणि हळव्या मनाचे होते. ते विचारत होते, “मी रात्रंदिवस मेहनत करतो, तरी मला का सतत गालबोट लावले जाते? बारामतीत लोक माझ्यावर टीका का करतात? मी कोणाचं काही वाईट केलं का?” विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहण्यासही ते तयार नव्हते; त्यांना खूप समजावून सांगावे लागले होते.

देवाबद्दलची श्रद्धा

लहानपणी वडिलांचा मृत्यू आणि कुटुंबावर आलेल्या आर्थिक संकटामुळे दादा सुरुवातीला नास्तिक होते. “देवानं माझं काय केलं?” असा प्रश्न ते विचारत. पण आयुष्याच्या अनुभवांनी त्यांच्या मनात श्रद्धा निर्माण झाली. ही श्रद्धा अंधश्रद्धेची नव्हती आणि त्यांनी कधीही राजकारणासाठी देवाचा वापर केला नाही, असे गुजर यांनी सांगितले.

शेवटचा फोन आणि भयानक क्षण

अपघाताच्या काही मिनिटे आधीच दादांनी गुजर यांना फोन केला होता. “मी विमानात बसतोय,” हे त्यांचे शेवटचे शब्द ठरले. गुजर त्यांना घेण्यासाठी विमानतळावर गेले होते. पण त्यांच्या डोळ्यांसमोरच विमानाचा भीषण अपघात झाला. “मृतदेह गाडीत ठेवताना मी ओळखलं की हे दादाच आहेत. मला वाटलं हे काही वाईट स्वप्न आहे, पण ते खरं होतं,” असे सांगताना गुजर यांचा आवाज भरून आला आणि डोळे पाणावले.

अजित पवार यांचा हा अकाली प्रवास आणि त्यांच्या मनातील ती सल आज सर्वांनाच भावूक करून सोडते. ‘दादा’ म्हणून ओळखले जाणारे हे नेते राजकारणात अथक होते, पण शेवटच्या दिवसांत त्यांच्या मनात थकवा आणि निराशेची भावना दाटून आली होती. महाराष्ट्राने एक कणखर नेता गमावला आहे.