जीवाची पर्वा न करता 52 मृतदेहांवर अंत्यसंस्कार, सांगलीतील पाच तरुणांची माणुसकी

| Updated on: May 31, 2021 | 6:35 PM

सांगलीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. आटपाडी तालुक्यातही रोज दीडशेच्यावर रुग्ण सापडत आहेत (Five youth helping for funeral of corona patients in Sangli)

जीवाची पर्वा न करता 52 मृतदेहांवर अंत्यसंस्कार, सांगलीतील पाच तरुणांची माणुसकी
जीवाची पर्वा न करता 52 मृतदेहांवर अंत्यसंस्कार, सांगलीतील पाच तरुणांची माणुसकी
Follow us on

सांगली : कोरोनाने मृत्यू झालेल्याचा रुग्णांच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न सगळीकडेच गंभीर बनलेला असताना सांगलीच्या आटपाडीत मात्र प्रसाद नलवडे आणि त्याची टीम कसलाही मोबदला न घेता अंत्यसंस्कार करीत आहेत. या तरुणांनी जीवाची परवा न करता तब्बल 52 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करून माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी पाच तरुणांसाठी प्रत्येकी पाच लाखाची विमा पॉलिसी काढून पोचपावती दिली आहे (Five youth helping for funeral of corona patients in Sangli).

सांगलीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ

सांगलीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. आटपाडी तालुक्यातही रोज दीडशेच्यावर रुग्ण सापडत आहेत. रुग्णसंख्या वाढल्यामुळे अनेकांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढला. तर कोरोनाने मृत्यू पावलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्काराची समस्या गंभीर बनली आहे. दिघंचीत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे त्यात अधिक भर पडली.

पाच तरुणांची सामाजिक बांधिलकी

रक्ताच्या नात्यांनी आणि समाजाने पाठ फिरवली असताना आटपाडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी प्रसाद नलवडे याने पुढाकार घेऊन नातेवाईकांच्या सहकार्याने मोफत अंत्यसंस्काराचे काम सुरू केले. त्याच्या सोबतीला सुरज जाधव, संदेश पाटील, प्रशांत पाटील आणि गणेश जाधव हे तरुण आले (Five youth helping for funeral of corona patients in Sangli).

52 मृतदेहांचे अंत्यसंस्कार

आटपाडी, तासगाव, सांगली, मिरज येथे उपचार घेणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी हे तरुण पुढे येत आहेत. नातेवाईकांची अडवणूक न करता कसलाही मोबदला न घेता ते अंत्यसंस्कार करतात. मृतदेह गाडीतून बाहेर काढून चितेवर ठेवून स्वतःच्या हाताने चिता रचतात आणि शेवटी अग्नी देतात. अशाप्रकारे दोन महिन्यात पाच तरुणांनी तब्बल 52 मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत.

पाच लाखांचे विमाकवच

कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्काराच्या मन हेलावून लावणाऱ्या घटना कानावर पडत असताना या तरुणांनी आटपाडीत अजून माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त झेडपीचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी श्रीमंत बाबासाहेब देशमुख बँक, शिक्षण संस्था, शिक्षक सेवक पत मंडळ आणि श्रीमंत बाबासाहेब देशमुख दूध संस्थेमार्फत पाच तरुणांचा प्रत्येकी पाच लाख प्रमाणे 25 लाखांची विमा पॉलिसी काढून त्यांच्या कामाची पोचपावती दिली.

हेही वाचा : Third Wave of Corona? : एकाच महिन्यात 8881 मुलांना कोरोना, नगरमध्ये कोरोनाची तिसरी लाट?