विमान अपघातामध्ये रोहित पवार यांना जे खटकलं तोच प्रश्न पिंकी माळी यांच्या वडिलांच्याही मनात; म्हणाले, …तर जीव वाचला असता

अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला, मृतांमध्ये फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा देखील समावेश आहे. आता त्यांच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

विमान अपघातामध्ये रोहित पवार यांना जे खटकलं तोच प्रश्न पिंकी माळी यांच्या वडिलांच्याही मनात; म्हणाले, ...तर जीव वाचला असता
Shivkumar Mali
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 27, 2026 | 7:06 PM

अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये विमानाची फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा देखील समावेश होता. दरम्यान या विमान अपघातप्रकरणात अजूनही एफआयआर दाखल करण्यात आलेली नाहीये, यामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. आता या सर्व पार्श्वभूमीवर पिंकी माळी यांचे वडील शिवकुमार माळी यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. अपघाताची शाहानिशा व्हायला पाहिजे, रोहित पवार यांच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे,  याची सत्यता बाहेर यायला पाहिजे. मला सीबीआयकडून कोणतीही माहिती मिळाली नाही,  केवळ ज्या बातम्या येतात त्यातून माहिती मिळते, असं यावेळी पिंकी माळी यांच्या वडिलांनी म्हटलं आहे.

दरम्यान विमान बदलण्यात आल्याचा आरोप देखील होत आहे, यावर देखील पिंकी माळी यांच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.  माझी मुलगी जेव्हा ड्युटीवर असायची त्यापूर्वी ती माझ्यासोबत चर्चा करायची.  यावेळी एकतर पायलट बदली झाला,  सकाळी साडेसहा वाजता कुठलं ट्रॅफिक असतं?  पायलट बदली झाला, विमान बदली झालं, कॅरियरमध्ये पाठीमागे इंधन ठेवलं होतं , अशी माहिती मिळाली. हे काय लगेच आहे का? इंधन कसं काय कोणी घेऊन जाऊ शकतं? सुरतला गेलेली फ्लाईट आली होती तर इंधन पूर्ण भरलेलं होतं. एका मिनिटांत पंधरा किलोमीटरची यांची रेंज आहे. ते विमान अजित पवार यांना बारामतीला सोडून संसदाबादला जाणार होतं. कदाचित इंधन जास्त असल्यामुळे मोठी आग लागली.  जर इंधन कमी असतं तर अनेक लोकांचा जीव वाचला असता, असं शिवकुमार माळी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अजित पवार यांच्या विमानाचा अपघात आहे की घातपात यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली.  याची सीआयडी चौकशी सुरू आहे,  रिपोर्ट समोर आल्यानंतर नक्की काय ते समजेल.  जे कायद्यामध्ये आहे, त्या पद्धतीने कारवाई झाली पाहिजे. जर कोणी गुन्ह्यात सापडत असेल तर त्यातील कोणालाही सोडलं नाही पाहिजे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

 

 

 

Follow Us