कलिंगड खाऊन चौघांचा मृत्यू, रातोरात मार्केटमधून कलिंगड गायब; ग्राहक आणि विक्रेते दोघेही हादरले

पायधुनी येथे एकाच कुटुंबातील चौघांचा कलिंगड आणि बिर्याणी खाल्ल्याने मृत्यू झाल्याच्या संशयामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मुंबईतील बाजारातून कलिंगड रातोरात गायब झाले असून, ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. फळ विक्रेते कलिंगड विकण्यास कचरत असून, त्यांना प्रशासनाकडून सत्य माहितीची अपेक्षा आहे, जेणेकरून अफवा थांबतील.

कलिंगड खाऊन चौघांचा मृत्यू, रातोरात मार्केटमधून कलिंगड गायब; ग्राहक आणि विक्रेते दोघेही हादरले
रातोरात मार्केटमधून कलिंगड गायब
| Updated on: Apr 29, 2026 | 2:29 PM

पायधुनीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यामुळे या चौघांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा वेगवेगळ्या अँगलने तपास करण्यात येत असले तरी ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये मात्र कलिंगडची धास्ती बसली आहे. ती इतकी की पायधुनीच्या मार्केटमधून रातोरात कलिंगड गायब झाले आहेत. एकही कलिंगड विक्रीला आलेलं नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसेच ग्राहकही कलिंगड मागायला येत नसल्याचं विक्रेत्यांनी म्हटलं आहे. कलिंगडामुळे भयानक घटना घडली. त्यामुळे भीतीपोटी आम्ही कलिंगड विकत नसल्याचं फळ विक्रेत्यांचं म्हणणं आहे.

पायधूनी येथे झालेल्या घटनेनंतर फळ मार्केटमधील कलिंगड गायब झाले आहेत. कलिंगडाबद्दल अफवा पसरल्यानंतर पायधूनी आणि नळबाजारातील फळ विक्रेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे. बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने एकाच घरातील चार सदस्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे फळ विक्रेते प्रचंड घाबरले आहेत. तसेच या घटनेनंतर फळ विक्रेते संभ्रमात पडले आहेत. या घटनेनंतर अनेक ग्राहकांनी कलिंगडाकडे पाठ फिरवली असून अनेक विक्रेत्यांनी कलिंगड विकण्यास मनाई केली आहे. ज्या अफवा पसरल्या जातायत यावर पालिका आणि सरकारने सत्य माहिती समोर आणावी, अशी मागणी फळ विक्रेते करत आहेत.

प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं काय?

दरम्यान, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणावर डॉ. झेथ कुरेशी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आहेत. त्या कुटुंबासोबत मी दुपारी 2 पर्यत हॉस्पिटलला उपस्थित होतो. जेव्हा त्यांना त्रास होतोय हे कळलं तेव्हा त्यांनी त्यांच्या नातेवाईक डॉक्टरला कॉल करून माहिती दिली होती. त्यांच्या मुलीची तब्येत जास्तच खराब होत होती तेव्हा मला बोलवलं. मला प्राथमिक उपचाराचा अंदाज असल्याने मी पहाटे उपचार केले. मात्र तब्येत जास्तच खराब झाल्याने चारही जणांना रुग्णालयात घेऊन गेलो. हॉस्पिटलला जाताना मुलीचा मृत्यू झाला होता. इतर सदस्यांवर उपचार सुरू होते, असं डॉ. झेथ कुरेशी म्हणाले.

हॉस्पिटलला गेलो तेव्हा मी डॉक्टरांशी बोललो. विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यानंतर मी कुटुंबीयांशी बोललो. त्यांनी रात्री काय खाल्लं होतं याची माहिती घेतली. तेव्हा कुटुंबाने कलिंगड खाल्ल्याचं समजलं. अर्ध कलिंगड त्यांच्या घरात होतं. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणात मनात जे काही संशय आहे, त्याची उत्तरं मिळाली पाहिजे, असं डॉ. झेथ कुरेशी यांनी सांगितलं.

Follow Us