देशातील महिला अशाच प्रकारे भाजपाला सत्तेतून हाकलून लावतील, मोर्चातील तो व्हिडीओ ट्विट करत सपकाळ यांचा जोरदार हल्लाबोल

भाजपच्या वतीने महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिलाच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. मात्र या मोर्चामध्ये वाहतुक कोंडी झाल्यानं एका चिडलेल्या महिलेनं याबाबत मंत्री गिरीष महाजन यांना जाब विचारला, यावरून आता काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

देशातील महिला अशाच प्रकारे भाजपाला सत्तेतून हाकलून लावतील, मोर्चातील तो व्हिडीओ ट्विट करत सपकाळ यांचा जोरदार हल्लाबोल
Harshvardhan Sapkal
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 21, 2026 | 10:22 PM

संसदेमध्ये भाजपकडून महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिल मांडण्यात आलं होतं. मात्र या विधेयकाला दोन तृतियांश बहुमत मिळू न शकल्यानं हे विधेयक नामंजूर झालं. यावरून आता आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण चांगलच रंगताना दिसत आहे. भाजपकडून विरोधकांवर आरोप केले जात आहेत, तर विरोधकांकडून देखील भाजपवर जोरदार हल्लाबोल सुरू आहे. त्यातच आज भाजपकडून महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिलाच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. मात्र या मोर्चामध्ये वाहतुक कोंडी झाल्यानं एका चिडलेल्या महिलेनं याबाबत मंत्री गिरीष महाजन यांना जाब विचारला, त्याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. हा व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले सपकाळ?

‘महिलांच्या सशक्तीकरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या, आरक्षणाचा मुद्दा पुढे करून महिलांची दिशाभूल करणाऱ्या आणि त्यांना केवळ राजकीय साधन म्हणून वापरत खोटे नॅरेटिव्ह पसरवणा-या भाजपाचा खरा चेहरा या भगिणीने वरळीहून निघालेल्या मोर्चासमोर जाऊन उघडा पाडला आहे. महिला आरक्षणाच्या आडून संविधान आणि निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याचा भाजपाचा डाव ‘इंडिया’ आघाडीने आधीच हाणून पाडला होता. त्यानंतर आता मोर्चे आणि प्रचाराच्या माध्यमातून पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू होता; मात्र या धाडसी भगिनीने तोही डाव उधळून लावला आहे. आज फक्त मंत्री गिरीष महाजन यांना पळवून लावले आहे. येणाऱ्या काळात देशातील महिला अशाच प्रकारे भाजपाला सत्तेतून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाहीत. भाजपा भगाओ, देश बचाओ!’ असं ट्विट सपकाळ यांनी केलं आहे.

 

दरम्यान दुसरीकडे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील या व्हिडीओवरून जोरदार निशाणा साधला आहे.  ‘आज मुंबईत भाजपच्या आंदोलनामुळे झालेल्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या एका महिला भगिनीने थेट मोर्चात जाऊन भाजप नेते तथा जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना खडेबोल सुनावले. भाजपच्या फेक नॅरेटिव्हला आता देशाची जनता कंटाळली आहे. पुढील काळात देशाची नारीशक्ती अशाच प्रकारे भाजपला सत्तेतून पायउतार करेल, यात शंका नाही.’ असं ट्विट  पटोले यांनी केलं आहे.

Follow Us