शिवसेना ठाकरे गटाचे किती खासदार शिंदेंच्या संर्पकात? अखेर आकडा समोर, ठाकरेंकडून वेगवान हालचाली, थेट मातोश्रीवर…
गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचे काही खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संर्पकात असल्याचा दावा केला जात आहे, आता या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या माातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत स्वत: अंबादास दानवे यांनी देखील मोठा दावा केला आहे, आमचे काही खासदार शिवसेना शिंदे गटाच्या संर्पकात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे सात खासदार हे लवकरच एकनाथ शिंदे यांच्याकडे येतील असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे हे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आहेत, त्यामुळे जबाबदारी म्हणून त्यांनी ती बैठक बोलावली असेल. परंतु आता मला असं वाटत नाही की ज्या खासदारांनी विचार केला आहे, ते खासदार शिवसेना ठाकरे गटात थांबतील. कारण आता पाणी डोक्याच्या वरून गेलं आहे. त्यामुळे ते सातही खासदार आता लवकरात लवकर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा गोगावले यांनी केला आहे, गोगावले यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
उद्या मातोश्रीवर बैठक
ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीमध्ये मोठी फूट पडली आहे, आमदारांनंतर खासदारांनी देखील त्यांची साथ सोडली, आता या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सावध पवित्रा घेतल्याचं पहायला मिळत आहे. त्यांनी 14 जूनला मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली आहे. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संर्पकात असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, त्यामुळे उद्याच्या बैठकीत नेमकं काय होणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया
दरम्यान दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी या बैठकीवरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ही बैठक म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याचं शिरसाट यांनी म्हटलं आहे. तसेच लोकं आता स्वत:हून पक्षातून बाहेर पडत आहेत, असा टोलाही त्यांनी यावेळी ठाकरेंना लगावला आहे.