रत्नागिरी : वऱ्हाड घेऊन येणारा टेम्पो पोलादपूर तालुक्यातील कुडपण येथे खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 3 जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी (8 जानेवारी) घडली. ही घटना सायंकाळी 7.00 वाजता घडली होती. या अपघातात आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असून 34 जण गंभीर जखमी आहेत. 25 नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात होताना तेथे इतर वाहनांतून प्रवास करणारे प्रवासी होते. या प्रवाशांनी हा अपघात प्रत्यक्षपणे पाहिला. या अपघाताचे नेमके कारण काय असावे याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आहे. निसरड्या रस्त्यामुळे हा अपघात झाला असावा असं या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. (how the Poladpur tempo accident happened, detail information)
पाऊस पडलेला, रस्ता ओला
अपघात झालेल्या टेम्पोमधील वऱ्हाडी मंडळी सातारा जिल्ह्यातील कोंडुशी येथे लग्नाला गेले होते. लग्न समारंभ पार पडल्यानंतर वऱ्हाडी मंडळी खेड तालुक्यातील खवटी येथे परतत होते. यावेळी या टेम्पोचा अपघात झाला. काही नागरिकांनी हा अपघात प्रत्यक्षपणे पाहिला. त्यांनी अपघात कसा आणि का झाला असावा हे सांगितलं आहे. अशाच एका प्रत्यक्षदर्शीने सांगितल्याप्रमाणे टेम्पो चालकाला रस्त्याचा अंदाज आला नासवा असा अंदाज आहे. तसेच रस्त्यावर पाऊस पडलेला होता. आधीच बिकट असलेला हा रस्ता पावसामुळे जास्तच ओला आणि निसरडा झाला. निसरडा रस्ता, पडलेला पाऊस आणि चालकाला रस्त्याचा न आलेला अंदाज यामुळे हा अपघात झाला असावा असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे.
अपघात झालेल्या टेम्पोच्या दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावर आणखी एक गाडी होती. या गाडीच्या चालकाने हा अपघात पाहिला. यावेळी पावसामुळे रस्ते ओले झालेले असल्यामुळे टेम्पो सरकत रस्त्याच्या बाजूला गेला आणि अपघात झाल्याचे या प्रत्यक्षदर्शीने सांगितले. अपघात होताच बचावकार्य करण्यासाठी आम्ही ग्रामस्थांकडे धाव घेतली. त्यांना अपघाताची माहिती दिली. तसेच, पोलीस, बचाव पथक, आणि रुग्णवाहिका यांना फोन करण्याचा प्रयत्न चालू होता. मात्र, मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे फोन लावण्यास अडचणी येत होत्या असं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे. अपघातस्थळापासून दूर जाऊन बचाव पथकाला फोन केल्याचं या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.
अपघात झाल्यानंतर रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक तुपे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी तत्काळ बचावकार्यास सुरुवात केली. अपघात नेमका कशामुळे झाला, याची माहिती त्यांनी दिली. “मिळालेल्या माहितीप्रमाणे या अपघातात आतापर्यंत 3 जण मरण पावले आहेत. 66 अपघातग्रस्तांची आम्ही यादी केली आहे. 34 जण गंभीर जखमी असून यामध्ये महिला आणि मुलं आहेत. अपघात झाल्यानंतर गावकऱ्यांनी मदतकार्यात साथ दिली. त्यामुळे आम्हाला रेस्क्यू ऑपरेशन करायला मदत झाली. स्थानिक डॉक्टर्सही तत्काळ धावून आले,” असे अशोक तुपे म्हणाले. तसेच, जरुरीपेक्षा जास्त लोक टेम्पोमध्ये बसलेले होते. त्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि अपघात झाला अशी महत्त्वाची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, या अपघातातील रुग्णांवर उपचार सुरु असून त्यांना जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल केलं आहे. पोलादपूर, महाड, खेड येथे अपघातग्रस्तांवर उपचार सुरु आहेत. या अपघाताची पोलिसांत नोंद केलेली असून तपास सुरु आहे.
संबंधित बातम्या :
(how the Poladpur tempo accident happened, detail information)