गिरीश बापट कसे होते ? नेमक्या शब्दात अजित पवार यांनी सांगितलं

| Updated on: Mar 29, 2023 | 1:43 PM

गिरीश बापट यांचे निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राचे सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीश भाऊंकडे पाहिले जायचे.

गिरीश बापट कसे होते ? नेमक्या शब्दात अजित पवार यांनी सांगितलं
GIRISH BAPAT AND AJIT PAWAR
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us on

मुंबई : भाजप ज्येष्ठ नेते, माजी मंत्री खासदार गिरीश बापट यांचे आज पुणे येथे दीर्घ आजाराने निधन झाले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करतानाच गिरीश बापट कसे होते हे नेमक्या शब्दात सांगितले. पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात असला तरी कसबा पेठ मतदारासंघात गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची डाळ शिजू दिली नव्हती. पण, बापट यांचे शरद पवार, अजित पवार यांच्यासोबत राजकारणापलीकडचे संबंध होते. त्यामुळेच अजित पवार यांनी बापट यांच्या निधनाचे वृत्त कळताच पुणे जिल्ह्याचे सर्वसमावेशक नेतृत्व आणि राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरपला अशी प्रतिक्रिया दिली.

टेल्को कंपनीतल्या कामगार नेत्यापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास पुणे महापालिकेचे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री, खासदार पदापर्यंत पोहचला. चार दशकांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत गिरीशभाऊंना पुणेकरांचे अलोट प्रेम मिळाले. 1995 पासून 2014 पर्यंत सलग पाच वेळा ते आमदार झाले. 2019 ला खासदार झाले. खासदार गिरीश बापट यांचे निधन हा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे असे अजित पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

गिरीश बापट यांचे निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राचे सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीश भाऊंकडे पाहिले जायचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या गिरीशभाऊंनी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून समाजकार्य, विकासाचे राजकारण केले.

राज्याचे मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पुणे शहर, जिल्ह्याच्या विकासातले त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. आजाराशी ते निर्धारनं लढत होतं. बरे होऊन सार्वजनिक जीवनात ते पुन्हा सक्रीय होतील, हा विश्वास आम्हा सगळ्यांना होता. तो विश्वास खोटा ठरला. गिरीशभाऊंच्या निधनाने पुणे जिल्ह्याचे सर्वसमावेशक नेतृत्व हरपलं आहे, असे ते म्हणाले.

आम्ही ज्येष्ठ सहकारी, सुहृदय मित्र गमावला. पुणे जिल्ह्याला, राज्याला गिरीशभाऊंची उणीव कायम जाणवेल. त्यांची आठवण कायम येत राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. गिरीशभाऊंच्या कुटुंबियांच्या, कार्यकर्त्यांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो, अशा शब्दात अजित पवार यांनी खासदार गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली.