माझ्याकडून चूक झाली…, गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रस पक्षप्रवेशाच्या दाव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

शनिवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल बोलताना मोठा दावा केला होता. गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते. असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र आता त्यानंतर मुंडेंच्या पक्षप्रवेशाबाबत माझ्याकडून चूक झाली असं म्हटलं आहे.

माझ्याकडून चूक झाली..., गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रस पक्षप्रवेशाच्या दाव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Prithviraj Chavan
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 16, 2026 | 5:15 PM

शनिवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल बोलताना मोठा दावा केला होता. गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला होता. परंतु तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मात्र या पक्ष प्रवेशाला विरोध केला, त्यामुळे हा पक्ष प्रवेश होऊ शकला नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं. चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली होती,  परंतु आता त्यांनी मुंडेंच्या पक्षप्रवेशाबाबत माझ्याकडून चूक झाली असं म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण? 

सोनिया गांधी गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशासाठी तयार होत्या, परंतु मनमोहन सिंग यांच्यामुळे हा पक्षप्रवेश होऊ शकला नाही, तेवढी ताकद त्यावेळी काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्याकडे होती का? असा प्रश्न यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना विचारण्यात आला, यावर उत्तर देताना मुंडेंच्या पक्षप्रवेशाबाबत माझ्याकडून चूक झाली असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. ‘प्रश्न असा आहे की, संसदीय परंपरेप्रमाणे एखाद्या व्यक्तीला पक्षात प्रवेश द्यायचा की नाही हे पक्षाध्यक्ष ठरवतात, आणि एखाद्या व्यक्तीला मंत्री करायचं असेल तर ते पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री ठरवतात, त्यामध्ये माझी चूक झाली, असं यावेळी चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान संजय राऊत म्हणतात की जर आज गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये असते तर जिंवत असते? असा प्रश्नही त्यांना यावेळी विचारण्यात आला, यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं की,  यावर मी फार काही बोलणार नाही, मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं. ज्या नेत्याला फार मोठं भवितव्य होतं असा नेता अचानक आपल्याला सोडून गेला. त्यामुळे मी त्याबद्दल फार काही बोलणार नाही.’ ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक आम्ही जिंकलो असतो, मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे, असंही यावेळी चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us