महाराष्ट्रात कडाक्याच्या ऊन्हात पावसाची एन्ट्री होणार, हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट

| Updated on: Mar 03, 2023 | 7:13 PM

Maharashtra Rain Update | महाराष्ट्रात मार्च महिन्यातील तीन दिवस अतिशय महत्त्वाची आहेत. कारण भर ऊन्हाळ्याच्या मौसमात वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागांमध्ये आगामी काळात पावसाची दाट शक्यता आहे.

महाराष्ट्रात कडाक्याच्या ऊन्हात पावसाची एन्ट्री होणार, हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात सध्या कडाक्याचा ऊन्हाळा सुरु आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर देशातील उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, राजस्थान अशा अनेक राज्यांमध्ये कडाक्याचं ऊन पडतंय. ऊन्हाळ्यामुळे अनेक जण आजारीदेखील पडत आहेत. ऊन्हामुळे अनेकांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. या दरम्यान हवामान विभागाकडून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरातच्या काही भागांमध्ये पाऊस (Maharashtra Rain Update) पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात तब्बल तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दरम्यानच्या काळात अनेक भागात ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 3 आणि 4 मार्चला म्हणजेच आज आणि उद्या हिमालयात हलक्या स्वरुपाची बर्फवृष्टी होईल. तर महाराष्ट्र, मध्य प्रदेशच्या दक्षिण भागात, तसेच गुजरात राज्यातील काही भागांमध्ये 5 ते 7 मार्च या तीन दिवसांच्या दरम्यान काही प्रमाणात (हलक्या स्वरुपात) पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरमीमुळे वैतागलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

जळगाव आणि नांदेडमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद

दरम्यान, राज्यात आज दिवसभरात जळगाव, नांदेड येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. राज्यात आज सोलापुरमध्ये 36.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईत 35.5, साताऱ्यात 34.6, ठाण्यात 36.2, जालन्यात 36.4, जळगावात 37.7, परभणीत 35, रत्नागिरीत 37, सांगलीत 35.3, छ संभाजी नगरमध्ये 35, उद्गीरमध्ये 35, नाशिकमध्ये 35, जेऊरमध्ये 35.2, हर्णेत 35.9, नांदेडमध्ये 37.2 आणि पणजीत सर्वाधिक 37.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

हे सुद्धा वाचा

अनेक ठिकाणी आजारपणाची साथ

जळगाव जिल्ह्यात सध्या दिवसा कडाक्याचं ऊन पडत असलं तरी सकाळी वातावरणात काहीसा गारवा असतो. त्यामुळे सकाळी थंडी वाजते. तर नऊ-दहा वाजेपासून कडाक्याच्या ऊन्हाला सुरुवात होते. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात आजारपणाचं प्रमाण वाढताना दिसत आहे. वातावरणात अस्थितरता असल्यामुळे अनेकांना ताप, खोकला, सर्दीचा त्रास सुरु झालाय. विशेष म्हणजे वातावरणात एवढे सगळे बदल सुरु असताना त्यात पावसाची आणखी भर होणार आहे.

राज्यातील काही भागांमध्ये कडाक्याच्या ऊन्हामुळे अनेकजण त्रस्त झाले आहेत. गरमीमुळे अनेकजण दुपारच्या वेळी घरातून बाहेर पडणं टाळत आहेत. असं असताना पावसाच्या हलक्या सरी पडल्यास नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अर्थात या पावसाकडे प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार चांगलं की वाईट ठरवणार आहे.