rain forecast : आभाळ फाटणार, पाऊस धुमाकूळ घालणार, 20 राज्यांना हाय अलर्ट, महाराष्ट्रालाही मोठा इशारा
राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान हवामान विभागाकडून आता देशातील तब्बल 20 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात पावसानं गेल्या काही दिवसांपासून चांगलाच धुमाकूळ घातला आहे, पावसामुळे राज्यात मोठं नुकसान झालं आहे. कमी वेळेत प्रचंड पाऊस झाल्याने नागरिकांची चांगली तारांबळ उडाल्याचं पहायला मिळालं. पालघर, नाशिक, पुणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांमध्ये तर पावसाने कहर केला आहे. दरम्यान आता 11 जुलै 2026 शनिवारचा हवामान अंदाज समोर आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून राज्यातील तब्बल 20 राज्यांना अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान याच काळात प्रति तास 80 किमी वेगाने जोरदार वारे देखील वाहन्याची शक्यता आहे. उत्तर भारतामध्ये पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढणार आहे, तर पूर्व भारतामध्ये देखील वादळी वाऱ्यासह अति मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असं आवाहनही या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
कोणत्या राज्यांमध्ये पावसाचा इशारा?
उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू काश्मीर, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्किम, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आसाम, त्रिपुरा, कर्नाटक, आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या राज्यांमध्ये येत्या 24 तासांमध्ये पावसाचा कहर पहायला मिळू शकतो. नागरिकांनी महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावे, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. तसेच पर्वतीय प्रदेशात भूस्खलन सारख्या देखील घटना घडू शकतात, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती?
गेल्या काही दिवसांपासून राज्याला पावसाने झोडपून काढलं आहे. महाराष्ट्रात आजही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्हा तसेच घाटमाथ्यावर पावसाचा इशारा देण्यात आला आहे, सातारा जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान पुढील दोन ते तीन दिवसांनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.