मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्याच षटकात काढल्या महाविकास आघाडीच्या चार नेत्यांच्या विकेटस

| Updated on: Feb 28, 2023 | 5:56 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधली. 'तुम्ही सभात्याग करतो म्हणाले पण कुणीच उठले नाही. हे काय सुरु आहे ? तुमचे कुणीच ऐकत नाही ? असे कसे होईल असे सांगत...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्याच षटकात काढल्या महाविकास आघाडीच्या चार नेत्यांच्या विकेटस
CM EKNATH SHINDE
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us on

मुंबई : कांदा प्रश्नावरून विरोधकांनी विधिमंडळात आज सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी कापसाची टोपी, कांद्याच्या माळा घालून आंदोलन केले. विरोधकांनी विधान परिषदेचे कामकाज रोखून धरले. दिवसभरासाठी विधान परिषद सभागृह तहकूब करण्यात आले. पण, विधानसभेचे कामकाज रोखून धरण्याची विरोधकांची रणनिती फसली. सरकारविरोधात फलंदाजीला उतरलेल्या अजित पवार, छगन भुजबळ, आदित्य ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे नाना पटोले अशा चार प्रमुख नेत्यांच्या विकेट गोलंदाजीला आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढल्या.

कांदा प्रश्नावरून विरोधकांनी आज सरकारची चांगलीच कोंडी केली. कांद्याला भाव मिळालाच पाहिजे… कापसाला भाव मिळालाच पाहिजे… हरभऱ्याला भाव मिळालाच पाहिजे… दोन रुपयाचा चेक देणार्‍या सरकारचा निषेध असो… गद्दार सरकार जोमात, शेतकरी मात्र कोमात… असा घोषणा देत विरोधकांनी विधान भवनाचा परिसर दणाणून सोडला. तीच परिस्थिती विधानसभेतही होती. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी बांग्लादेशात द्राक्ष निर्यात करण्यासाठी असलेली इम्पोर्ट ड्युटी कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतः बांग्लादेशाच्या पंतप्रधानांशी बोलून प्रश्न मार्गी लावावा. यासाठी राज्यशासनाने केंद्रसरकारकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली. कांद्याचे दर कोसळल्याने नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. याकडेही भुजबळ यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे. नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली आहे. हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारे आहे. आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषापेक्षा जास्त मदतही केली आहे असे उत्तर देत अजित पवार, भुजबळ यांच्या आरोपात हवा काढली.

याच दरम्यान उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी खाली बसूनच मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टिप्पणी केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ए बस खाली, तुला शेतीमधलं काय कळतंय’ असे म्हणत त्यांची विकेट काढली. इतके झाल्यावर फलंदाजीस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले उभे राहिले.

अजित पवार, छगन भुजबळ यांनी मांडलेले प्रश्नच नाना पटोले मांडत होते. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना थांबवले. दरम्यानच्या काळात काही सदस्यांनी औचित्याचे मुद्दे मांडले. नाना पटोले यांनी पुन्हा स्थगनच्या मुद्द्यावर बोलण्यास सुरवात केली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना परवानगी नाकारली. त्यावर सभागृहात बोलू देत नसल्याच्या निषेधार्थ नाना पटोले यांनी सभात्यागाचे हत्यार उपसले. मात्र, त्यांच्यासोबत कुणीही काँग्रेसचे आमदार उठले नाहीत. हीच संधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधली. ‘तुम्ही सभात्याग करतो म्हणाले पण कुणीच उठले नाही. हे काय सुरु आहे ? तुमचे कुणीच ऐकत नाही ? असे कसे होईल असे सांगत नाना पटोले यांची विकेट काढली.