राज्यात गारपिटीचा हाहाकार! 12 जिल्ह्यांमध्ये संकट, थेट ऑरेंज अलर्ट, पुढील..
भारतीय हवामान विभागाने नुकताच मोठा इशारा दिला. पावसासह गारपिटीचे मोठे संकट राज्यावर आहे. काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला तर राज्यातील उर्वरित भागात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. सततच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहेत. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने धोक्याची घंटा वर्तवली आहे. गारपिटीसह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात आज वादळी पाऊस आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला. बाकी संपूर्ण राज्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. आज मार्च महिन्याचा शेवटचा दिवस आहे, तरीही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. परभणी, बीड, जळगाव, पुणे, सातारा, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, जालना या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसासह गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जारी केला. बाकी संपूर्ण राज्यात आज पावसाचा येलो अलर्ट आहे. सकाळपासूनच अनेक भागात अवकाळी पावसाला सुरूवात झाली. हेच नाही तर मुंबईसह अन्य भागात ढगाळ वातावरण झाले.
कालपासून राज्याच्या अनेक भागात जोरदार अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामध्येच आजही पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मालेगाव, मनमाड, सटाणा आणि कळवण परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटही झाली.
या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. मालेगाव, मनमाड, सटाणा आणि कळवण तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, तर काही भागात गारपीटही झाल्याची माहिती मिळत आहे. या अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. विशेषतः काढणीला आलेला कांदा, डाळिंब आणि मका या पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
धुळे जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारांचा वर्षाव झाला अचानक झालेल्या गारपिटीमुळे नागरिकांची धावपळ उडाली. धुळे जिल्ह्यामध्ये साखरी तालुक्यातील पिंपळनेरसह धुळे तालुक्यातील कुसुंबा भागांमध्ये जोरदार वाऱ्यांसह पाऊस आणि गारांचा पाऊस झाला. वादळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाले. शेतात असलेला कांदा, मका, ज्वारी बाजरीचा नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.