अरेरे! इन्शुरन्स तौक्ते चक्रीवादळाच्या एक दिवस आधी संपला, आंबा-काजू बागायतदार वंचित

| Updated on: May 27, 2021 | 9:22 AM

मे महिन्याच्या उत्तरार्धात हापूस आंब्याचा शेवटचा हंगाम असतो. मात्र, चक्रीवादळामुळे बागांमधील सर्व फळे खाली पडली. | Tauktae cyclone Mango cashew

अरेरे! इन्शुरन्स तौक्ते चक्रीवादळाच्या एक दिवस आधी संपला, आंबा-काजू बागायतदार वंचित
Mango
Follow us on

रत्नागिरी: तौक्ते चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालेल्या कोकणवासियांना आता मदत मिळण्यातही अनेक अडचणी येत आहेत. शासनाकडून मिळणारी मदत सामान्यांपर्यंत कितपत पोहोचते, हा विषय संशोधनाचा आहे. मात्र, शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता आपल्या बागांचा विमा (Insurance) काढलेल्या कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांवर आता डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. कारण, या बागायतदारांनी काढलेल्या विम्याची मुदत तौक्ते चक्रीवादळाच्या (Tauktae cyclone) एक दिवस आधी संपुष्टात आली. त्यामुळे आता या सर्वांना विम्याच्या रक्कमेपासून वंचित राहावे लागणार आहे. (Tauktae cyclone damage in Konkan Maharashtra region)

प्राथमिक माहितीनुसार, कोकणातील एकूम 21,351 बागायतदारांना तौक्ते चक्रीवादळाच्या या ‘टायमिंगचा’ फटका बसणार आहे. विम्यासाठी ग्राह्य कालावधी प्रमाणे अवकाळी पावसासाठी 1 डिसेंबर ते 15 मे असा कालावधी निश्चित केला जातो. त्यानुसार हा कालावधी 15 मे रोजी संपला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोकणपट्ट्यात तौक्ते चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले.

यामध्ये आंबा आणि काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. मे महिन्याच्या उत्तरार्धात हापूस आंब्याचा शेवटचा हंगाम असतो. मात्र, चक्रीवादळामुळे बागांमधील सर्व फळे खाली पडली. तसेच झाडांचेही मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. आंब्याप्रमाणे काजू बागायतदारांनाही याचा फटका बसणार आहे. तब्बल 3093 काजू बागायतदारांनी विमा उतरवला होता. मात्र, विम्याची मुदत संपल्यामुळे त्यांनाही आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान

काही दिवसांपूर्वीच अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे कोकण आणि गुजरात परिसरात प्रचंड नुकसान झाले होते. हे चक्रीवादळ कोकण आणि मुंबई किनारपट्टीच्या भागातून गेल्यामुळे मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहताना पाहायला मिळाले होते. त्यामुळे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड भागातील अनेक घरांची पडझड झाली. तसेच काही दुर्घटनांमध्ये लोकांनी आपला जीवही गमावला होता.

आंबा व केळीच्या बागा जमीनदोस्त

तौक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला जोरदार फटका बसला आहे. तुफानी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंबा व केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. घरांचे पत्रे उडून गेले आहेत तर अनेक घरांच्या भिंती पडून मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचा मुख्य स्रोत असलेल्या आंबा व केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे तसेच मच्छिमारांच्या बोटींचेही नुकसान झाल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. कोरोनामुळे आधीच संकटाचा सामना करत असलेल्या जनतेला या तौक्ते वादळाचा फटका बसून मोठे नुकसान झाले आहे.

संबंधित बातम्या:

Yaas Cyclone: महाराष्ट्रालाही ‘यास’चा फटका बसणार; आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Cyclone in Maharashtra : सिंधुदुर्गला सर्वाधिक फटका, रस्ते बंद, बत्ती गुल, नेटवर्क गायब!

Photo Story: ‘तौक्ते’चा तडाखा, मुंबईत दोन तासात 132 झाडे पडली, सी-लिंक बंद; विमानांचे उड्डाणही थांबवले

(Tauktae cyclone damage in Konkan Maharashtra region)