मनमाड- जळगाव रेल्वेमार्गावर 14 -15 ऑगस्ट रोजी मेगाब्लॉक, 33 ट्रेन रद्द तर 19 ट्रेनचे वेळापत्रक बदलले

मनमाड आणि जळगाव दरम्यान रुळ दुरुस्तीचे काम सुरु होणार असल्याने उत्तर भारतातून मुंबईकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या आहेत तर काही गाड्या वळविण्यात आल्या आहेत.

मनमाड- जळगाव रेल्वेमार्गावर 14 -15 ऑगस्ट रोजी मेगाब्लॉक, 33 ट्रेन रद्द तर 19 ट्रेनचे वेळापत्रक बदलले
manmad
Image Credit source: socialmedia
| Updated on: Aug 12, 2023 | 10:11 PM

नाशिक | 12 ऑगस्ट 2023 : मनमाड आणि जळगाव दरम्यान तिसऱ्या मार्गिकेसाठी दुरुस्तीकामासाठी येत्या 14 – 15 ऑगस्ट असा दोन दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मनमाड मार्गे मुंबई, नांदेड, पुणे या मार्गांवरील 33 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर 19 रेल्वे गाड्यांना अन्य मार्गावरुन वळविण्यात आले असल्याची माहीती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

मनमाड आणि जळगाव दरम्यान काम सुरु होणार असल्याने उत्तर भारतातून मुंबईकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या आहेत तर काही गाड्या वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहीतीनूसार मनमाड, जळगाव दरम्यान तिसरा मार्ग तयार करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी रुळ टाकण्याचे काम सुरु आहे. यासाठी 14 आणि 15 ऑगस्ट असा दोन दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मेगाब्लॉकमुळे 33 गाड्या रद्द तर 19 गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. या गाड्यांमध्ये (ट्रेन क्र. 11113 ) देवळाली -भुसावळ एक्सप्रेस, ( ट्रेन क्र. 22223 ) मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत, ( ट्रेन क्र. 17617) सीएसएमटी-नांदेड एक्सप्रेस, (ट्रेन 11119) इगतपुरी-भुसावळ एक्सप्रेस, ( ट्रेन क्र. 12071 ) सीएसएमटी- जबलपूर, ( ट्रेन 02131) पुणे-जबलपुर एक्सप्रेस, (ट्रेन 01027) दादर- गोरखपूर, (ट्रेन 12113) मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस, (ट्रेन 11401) मुंबई-आदिलाबाद एक्सप्रेस, (ट्रेन 12135) पुणे-नागपुर एक्सप्रेस, ( ट्रेन 17057) मुंबई-सिकंदराबाद एक्सप्रेस, (ट्रेन 12113) पुणे-नागपुर एक्सप्रेस, ( ट्रेन क्र. 12139) मुंबई- नागपूर एक्सप्रेस ( ट्रेन 17612) मुंबई – नांदेड एक्सप्रेस, ( ट्रेन क्र. 11039 ) कोल्हापूर गोंदिया एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे.

अमृत भारत योजनेत मनमाड 

देशभरातील 508 आणि महाराष्ट्रातील 44 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यात नाशिक जिल्ह्यातील चार रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.  प्रवाशांना सर्वोत्तम आणि अत्याधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तर भुसावळ विभागातील 15 रेल्वे स्थानकांचा यात समावेश असणार आहे. जिल्ह्यातील मनमाड रेल्वेस्थानक आधुनिकीकरण रुपये 44.80 कोटी, नगरसुल रेल्वेस्थानक आधुनिकीकरण रुपये 20.03 कोटी, लासलगाव रेल्वेस्थानक आधुनिकीकरण रुपये 10.10 कोटी, नांदगाव रेल्वेस्थानक आधुनिकीकरण रुपये 10.14 कोटी निधी मंजूर करण्यात आला.