‘जाळपोळ करु नका, नाहीतर वेगळा निर्णय जाहीर करणार’, मनोज जरांगे पाटील यांचं मोठं वक्तव्य

"बहुतेक सत्ताधाऱ्यातीलच लोकं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांची घरे जाळून घेत आहेत, असा अंदाज आहे. मराठ्यांच्या शांततेच्या आंदोलनाला ते डाग लावत आहेत ही माझी शंका शंभर टक्के खरी निघणार आहे. मी याबाबत शोध लावायला लावतो. कारण यांना विनाकारण हे आंदोलन चिघळायचं आहे. पण हे आंदोलन चिघळू शकत नाही. सामान्य मराठे शांततेत आंदोलन करत आहेत", असं मनोज जरांगे म्हणाले.

जाळपोळ करु नका, नाहीतर वेगळा निर्णय जाहीर करणार, मनोज जरांगे पाटील यांचं मोठं वक्तव्य
manoj jarange patil
Image Credit source: tv9 marathi
Chetan Patil | Updated on: Oct 30, 2023 | 7:03 PM

जालना | 30 ऑक्टोबर 2023 : बीडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण येताना दिसत आहे. मराठा आंदोलकांनी माझलगाव येथे आमदार प्रकाश सोळंके यांची गाडी जाळून टाकली आहे. तसेच त्यांच्या बंगल्याला आग लावल्याची घटना समोर आली. त्यानंतर माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या बंगल्याला मराठा कार्यकर्त्यांनी आग लावली. तसेच मराठा कार्यकर्त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यादेखील बंगल्याला आग लावल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाळपोळीच्या घटना समोर आल्यानंतर तातडीने पत्रकार परिषद घेतलीय. यावेळी त्यांनी आक्रमक मराठा आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं आहे.

“सगळ्या मराठा समाजाला सांगितलं होतं, साखळी उपोषण आणि आमरण उपोषण करायचं. माझ्या मताने कोट्यवधींच्या संख्येत असणारा मराठा समाज शांततेने आंदोलन करतोय. त्याला असल्या गोष्टींशी काहीही देणंघेणं नाही. मला जे समाज सांगेल ते मी करतोय. मी जे सांगतोय ते माझा गोरगरीब समाज करतोय. हे माझं शंभर टक्के मत खरं आहे. जाळपोळ करु नका. उद्रेक करु नका”, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा कार्यकर्त्यांना केलं.

‘जाळपोळ आणि तोडफोडीला समर्थन नाही’

“हे कोण करतंय? ही थोडी शंका आहे. पण मी महाराष्ट्रातील मराठा समाजाला जाहीर आवाहन करतोय. आज रात्री आणि उद्या दिवसा मला कुठेही जाळपोळ केल्याची किंवा नेत्याच्या घरी गेल्याची बातमी आलेली नकोय. नाहीतर मला उद्या संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन वेगळा निर्णय घ्यावा लागेल. जाहीर सांगतोय. मी पुन्हा सांगतोय. आज रात्री किंवा उद्या दिवसा मला जाळपोळ केल्याची घटना ऐकू यायला नको. आरक्षण हा गोरगरीब मराठ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. उगाच धिंगाणा घालण्याचा प्रश्न आहे. माझं या जाळपोळ आणि तोडफोडीला समर्थन नाही”, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.

‘…तर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल’

“तुम्ही आज रात्री आणि उद्या सकाळी हे थांबवलं नाही तर मला उद्या संध्याकाळी वेगळा निर्णय घ्यावा लागेल. मी आज आणि उद्या सुद्धा चौकशी करणार आहे की जाळपोळ करणारे नेमके कोण आहेत. बहुतेक सत्ताधाऱ्यातीलच लोकं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांची घरे जाळून घेत आहेत, असा अंदाज आहे. मराठ्यांच्या शांततेच्या आंदोलनाला ते डाग लावत आहेत ही माझी शंका शंभर टक्के खरी निघणार आहे. मी याबाबत शोध लावायला लावतो. कारण यांना विनाकारण हे आंदोलन चिघळायचं आहे. पण हे आंदोलन चिघळू शकत नाही. सामान्य मराठे शांततेत आंदोलन करत आहेत”, असं मनोज जरांगे म्हणाले.

‘मला त्रास होणार असं…’

“मला त्रास होणार असं मराठा समाजाने वागायला नको. मला त्रास होणार नाही याची मराठा समाजाने काळजी घ्यावी. उद्रेक करण्याची काहीच गरज नाही. उद्रेक केल्याशिवाय शांततेत मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं. सरकार आरक्षण कसं देत नाही ते फक्त तिसरं आणि चौथ्या टप्प्यात दिसेल. कोणाच्याही दारात जायचं नाही असं आपलं ठरलंय”, असं मनोज जरांगे म्हणाले.

“हे सामान्य मराठे दिसत नाहीत. हे बहुतेक सत्ताधाऱ्यांचेच माणसं दिसत आहेत. आपल्याला कोणाच्या घरी जायचं नाही. जाळपोळ बंद करा. मग तु्म्ही आपल्या समाजाचे असाल किंवा सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते असाल, जाळपोळ बंद करा. आपल्याला शांततेने गोरगरीब समाजाला न्याय द्यायचा आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us