जरांगे यांची प्रकाश सोळंकेंवर टीका, म्हणाले, ‘तो कधी सोसायटीतही निवडून येऊ शकत नाही, पण..’

मराठा कार्यकर्ते आज चांगलेच आक्रमक झाले आहेत. मराठा कार्यकर्त्यांनी आज बीडमध्ये अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांची गाडी जाळली. तसेच त्यांच्या बंगल्यालादेखील जाळपोळ केली. या घटनेबाबत मनोज जरांगे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी मनोज जरांगे यांनी प्रकाश सोळंके यांच्यावर टीका केली.

जरांगे यांची प्रकाश सोळंकेंवर टीका, म्हणाले, तो कधी सोसायटीतही निवडून येऊ शकत नाही, पण..
Chetan Patil | Updated on: Oct 30, 2023 | 7:31 PM

जालना | 30 ऑक्टोबर 2023 : मराठा कार्यकर्ते आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यभरात ठिकठिकाणी मराठा कार्यकर्त्यांकडून आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. जालन्याच्या अंतरली सराटी गावात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. मनोज जरांगे यांच्याकडून शांततेत आंदोलन सुरु आहेत. तर इतर मराठा संघटनांच्या काही कार्यकर्त्यांकडून आक्रमक आंदोलन सुरु झालं आहे. काही मराठा कार्यकर्त्यांनी अनेक नेत्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्याचा प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान मराठा आंदोलकांकडून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आली. तर बीडच्या माझलगावमध्ये धक्कादायक प्रकार घडला.

मराठा कार्यकर्त्यांनी बीडच्या माझलगावमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याची जाळपोळ केली. याबाबत मनोज जरांगे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रकाश सोळंके यांच्यावर टीका केली. “ते लयी खोडी आहे. त्याने काहीतरी म्हणलं असेल. त्याला मराठ्यांनी मोठं केलंय. तो कधी सोसायटीत सु्द्धा निवडून येऊ शकत नाही. मराठ्यांनी त्याला मंत्री केलं, उपमुख्यमंत्री केलंय. आता मराठ्यांना ज्ञान शिकवणार का? तो काहीतरी बोलल्याशिवाय माझे मराठी वाटेत जाणार नाहीत हे मी खात्रीने सांगतो”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

‘माझ्या मराठ्याच्या पोराला त्रास द्यायचा नाही’

“तिथल्या काही मराठ्यांच्या काही पोरांनी केलंच नसेल. पण समजा केलं असेल तर माझ्या मराठ्याच्या पोराला त्रास द्यायचा नाही. नाहीतर मी स्वत: आग्यामोहोळ हे पूर्ण घेऊन तिथे येईन”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय.

‘तुम्ही आमच्या वाटेत जाऊ नका’

“मराठे नेहमी आधी कोणाच्याच वाटेत जात नाहीत. तुम्ही आमच्या वाटेत जाऊ नका. आम्ही तुम्हाला काहीच करत नाहीत. उलट मराठे त्यांना भाजी-भाकरी खाऊ घालतात. तुम्ही उलटे बोलले तर मी काय सांगू त्यांना. ते मराठे आहेत. ते आपोआप काय करायचं ते करतील”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us