जयंत पाटील म्हणाले, ‘नाचा नाची हे शब्द मराठीच’, नवनीत राणांबाबतचं संभाषण कॅमेऱ्यात कैद
संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राऊत आणि जयंत पाटील यांची भेट झाली. यावेळी जयंत पाटील हे संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबतचा विषय काढतात. या विषयावर बोलताना संजय राऊत नटीला नटी नाही तर काय म्हणायचं? असा सवाल करतात.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जात आहे. विशेष म्हणजे नवनीत राणा यांनी आता संजय राऊतांना सडेतोड उत्तर दिलं आहे. असं असताना संजय राऊत आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. नटीला नटी नाही तर काय म्हणायचं? असं संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांच्यातील संभाषण कॅमेऱ्यात कैद झालं आहे. या व्हिडीओत संजय राऊत आपण काही चुकीचं बोललं नसल्याचं म्हणत आहेत. त्यांच्या संभाषणाचा संबंधित व्हिडीओ आता समोरही आला आहे. या संभाषणात जयंत पाटील हे ‘नाचा नाची हे शब्द मराठीच आहेत’, असं म्हणताना दिसत आहेत.
राऊत-जयंत पाटील यांच्यातील संभाषण काय?
या व्हिडीओत जयंत पाटील म्हणतात, “अमरावतीचं मी टीव्हीवर बघितलं काल…”, त्यावर संजय राऊत म्हणाले की, “गुन्हा दाखल केलाय असं कळलंय काहीतरी. आता मी तिला म्हटलं, नटीला नटी नाही तर काय म्हणणार? आता मला इंग्लिश शब्द येत नाहीत”, असं संजय राऊत म्हणाले. त्यावर जयंत पाटील म्हणाले, “नाचा, नाची हे शब्द मराठीच आहेत.” यानंतर संजय राऊत म्हणतात, “हो, ती डान्सर आहे.” यावेळी संजय राऊत यांच्या बाजूला बसलेले नितीन बानगुडे पाटील म्हणाले, “डान्सरला दुसरं काय बोलणार?”
नवनीत राणा यांचं राऊतांना प्रत्युत्तर
“आमचा जिल्हा अंबानगरी म्हणून ओळखला जातो. त्याच अंबानगरीत येऊन एका महिलेची इतक्या खालच्या पातळीवर टीका करणं, मी तर कलाकार होती. पण माझ्या वडिलांनी जे योगदान या देशासाठी दिलं आहे, त्यांनी देशाच्या सीमेवर नागरिकांच्या सेवेसाठी योगदान दिलं आहे. मी माझं काम केलं आणि मी माझ्या लोकांची सेवा करत आहे”, असं नवनीत राणा म्हणाल्या.
“संजय राऊत यांच्या वक्तव्यापेक्षा जास्त दु:ख हे संजय राऊत यांनी जिथे वादग्रस्त वक्तव्य केलं, त्याच मंचावर माजी पालकमंत्री ज्या माझ्या नणंद बाई आहेत, त्या खिल्ली उडवून हसतात, या गोष्टीचं सर्वात मोठं दु:ख आहे”, अशी भावना नवनीत राणा यांनी व्यक्त केली.
“संजय राऊत यांना विचारुन घ्या की ते काय शब्द बोलले आहेत. त्यांच्या मुलीचं जेव्हा लग्न झालं, त्यांनी ज्यांना सासरी पाठवलं त्यांना विचारा की ते काय शब्द बोलले. त्यांच्या आईला ज्यांनी त्यांना जन्म दिला आहे त्या आईला विचारा की त्यांनी काय शब्द वापरले आहेत. उद्धव ठाकरे गटाचे जे थोडेफार लोकं राहिले आहेत त्यामध्ये सर्वात बोगस व्यक्ती हे संजय राऊत आहेत. संजय राऊत यांना या अंबानगरीची महिला 26 एप्रिलला दाखवणार आहे की, महिलांची काय ताकद आहे”, अशी शब्दात नवनीत राणा यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं.
संजय राऊत यांचं वादग्रस्त वक्तव्य काय?
“विकासाचं पोरगं तुम्हाला झालं नाही, म्हणून तुम्ही दुसऱ्याचे नवरे करता. ती बाई तुम्हाला खुणावेल, ती पडद्यावरची नटी आहे. तुम्हाला बोलावेल पण तुम्ही जायचं नाही. आपला उमेदवार बळवंत वानखेडे आहे. रात्र वैऱ्याची आहे. रात्रीस खेळ चाले”, असं वादग्रस्त वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे.