
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर प्रसिद्ध इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकावणारा तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याच्यावर राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले आहेत. आता मला माझाची लाज वाटतेय. आपण स्वत:ला मर्द का म्हणवून घेत आहोत, असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी हा संताप व्यक्त केला.
मला माझीच स्वतःची लाज वाटतेय. आम्ही स्वतःला मर्द का म्हणवून घेतोय याबाबत लाज वाटतेय. कारण कोणीतरी टीनपाट उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर काही तरी बोलतो. कोरटकर आणि राहुल सोलापूरकर ही दोन हलकट माणसं काहीतरी बोलतात आणि पळून जातात. कोरटकर गुहाटीमध्ये लपला आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
त्यांना राजाश्रय असणार
ही लढाई माझी नाही. तुमच्या माझ्या अस्मितेची आहे. प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरला जोपर्यंत चापट्या बसत नाहीत, तोपर्यंत शांत बसणार नाही. जोपर्यंत यांचं तोंड रंगवत नाही, तोपर्यंत जिवाला शांतता मिळणार नाही. या लोकांना राजाश्रय असणार, त्याशिवाय गायब होतात का?, असा आरोप आव्हाड यांनी केला.
लाजलज्जा शरम आहे की नाही?
यावेळी त्यांनी राज्याचे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्यावरही टीका केली. पुणे बलात्कार प्रकरणातील तरुणी ओरडली का नाही? असा सवाल योगेश कदम यांनी केला होता. त्यावरून आव्हाड यांनी कदम यांना चांगलंच फैलावर घेतलं. आपला मंत्री म्हणतो ती ओरडली नाही. या मंत्र्याला लाजलज्जा शरम आहे की नाही? तो लहान आहे. त्याच्या वडिलांना सांगायचं आहे की असं बोलू देऊ नका, असा हल्लाच आव्हाड यांनी केला.
त्यांचीच पोरं तुरुंगात जात आहेत
वाल्मिक कराडला तुरुंगात सर्व सुविधा मिळत आहेत. त्यावरूनही त्यांनी संताप व्यक्त केला. खून करावा तो वाल्मिक कराडने आणि जीवन जगाव ते पण वाल्मिक कराडनेच. आपण येडे आहोत. आपण वाल्मिक कराडच्या गँगमध्ये जाऊन सामील व्हावं. आज जेलमध्ये त्याची बडदास्त राखली जातेय. काहीतरी छोट्या मोठ्या गुन्ह्यात वाल्मिकची पोरं जेलमध्ये जातायत आणि त्याच्या बराकीत जाऊन त्याची सेवा करतायत. डोकं दाबायला, पाय दाबायला, हात दाबायला जेलमध्ये पोरं आहेत. यांना सीसीटीव्ही फुटेज मागितले तरी ते देणार नाहीत. सोमनाथ सूर्यवंशी याची सीसीटीव्ही फुटेज यांनी दिले नाही, असं ते म्हणाले.
राज्यात नंबर प्लेटचा मोठा स्कॅम
राज्यात मोठा नंबर प्लेट स्कॅम सुरू आहे. तीन पट रक्कम मोजून नंबर प्लेट दिल्या जात आहेत. गोवा, गुजरात येथे नंबर प्लेटसाठी पैसे कमी घेतले जातात. इथे जास्त रक्कम घेतली जाते. कंत्राटदार एकही महाराष्ट्रातील नाही. अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून स्कॅम होत आहे. मी प्रतापराव सरनाईक यांना विचारले. ते म्हणाले, मला माहिती नाही. हा भ्रष्टाचार अधिकाऱ्यांनी केला आहे. हे अधिकारी महाराष्ट्र विकतील काही दिवसांत, असा हल्ला त्यांनी चढवला.