‘ऑपरेशन टायगर’वरून कैलास पाटलांचा पलटवार; म्हणाले, ‘पाळत ठेवायची असेल तर…’
तुळजापूर येथील CCTV कॅमेऱ्यांच्या मुद्द्यावरून धाराशिवच्या राजकारणात ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यात तीव्र आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पाटील यांनी चिनी कॅमेऱ्यांवरून सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला, तर सरनाईक यांनी ‘ऑपरेशन टायगर’चा उल्लेख करत पाटील यांच्यावर टोला लगावला. पाटील यांनी सरनाईकांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करत, तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेसारख्या गंभीर विषयावर राजकारण न करण्याचे आवाहन केले.

तुळजापूर येथील CCTV कॅमेऱ्यांच्या मुद्द्यावरून धाराशिवच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना चांगलाच वेग आला आहे. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी तुळजापूरमध्ये बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सुरक्षेचा आणि परवानगीचा गंभीर प्रश्न उपस्थित केला होता. मात्र त्यानंतर धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘ कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असतील’ असं वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या, विविध चर्चांनाही उधाण आलं. मात्र आता, पाटील यांनी या वक्तव्यावर जोरदार पलटवार केला आहे. तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयावर टिंगल-टवाळी करणे योग्य नसल्याचे सांगत कैलास पाटील यांनी पालकमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
कैलास पाटील यांनी तुळजापूरमध्ये बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांच्या मुद्द्यावरून यापूर्वी गंभीर आरोप केले होते. केंद्र सरकारची परवानगी नसलेल्या चिनी कंपनीचे CCTV कॅमेरे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशाने बसवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. या आरोपांवरून दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगल होतं. त्यावर उत्तर देताना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेलं विधान चर्चेत आलं होतं. कैलास पाटील हे ‘ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असतील’ असं विधान सरनाईक यानी काल माध्यमांशी बोलताना केलं होतं. एवढंच नव्हे तर तुळजापूरमध्ये बसवलेल्या CCTVच्या माध्यमातून कैलास पाटील कुठे जातात, घरी कधी जातात आणि तुळजापूरला कधी येतात याची माहिती ठेवली जात असल्याचा मिश्किल टोला सरनाईक यांनी लगावला होता. या माहितीच्या आधारे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी करू, असाही दावा त्यांनी केला होता.
कैलास पाटील यांनी व्यक्त केली नाराजी
मात्र सरनाईक यांच्या या वक्तव्यामुळे कैलास पाटील भडकले आबेत. ‘CCTVच्या बाबतीत चायनीज-जपानीज असं बोलणं पालकमंत्र्यांकडून अपेक्षित नव्हतं,’ अशी टीका त्यांनी केली. तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेचा आणि CCTV व्यवस्थेचा विषय हा केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा विषय नसून सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असल्याचं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. एवढंच नव्हे तर CCTV प्रकरणातील मूळ मुद्द्यावर उत्तर देण्याऐवजी ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चा करून विषयाला वेगळे वळण दिले जात असल्याचा आरोपही कैलास पाटील यांनी केला. ‘ CCTV प्रकरणासारखा गंभीर प्रश्न समोर असताना विषयांतर करणे योग्य नाही,’ असे म्हणत त्यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर निशाणा साधला.
‘पाळत ठेवायची असेल तर 24 तास कॅमेरे असलेली गाडी मागे लावा’
आपल्यावर CCTVच्या माध्यमातून पाळत ठेवली जात असल्याच्या सरनाईक यांच्या वक्तव्यावरही कैलास पाटील यांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली. ‘माझ्यावर पाळत ठेवायची असेल तर 24 तास कॅमेरे असलेली गाडी माझ्या मागे लावा,’ असं आव्हान पाटील यांनी दिलं.
