काश्मीरमधील वातावरणाचा महाराष्ट्रावर परिणाम; थंडीची लाट येणार?

हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार राज्याच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढणार असून. या थंडीचे मूळ कारण आहे काश्मीरमध्ये बदलणारे हवामान. काश्मीरमधील वातावरणामुळे महाराष्ट्रावर परिणाम होत असून थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

काश्मीरमधील वातावरणाचा महाराष्ट्रावर परिणाम; थंडीची लाट येणार?
Mayuri Sajerao | Updated on: Dec 17, 2024 | 4:11 PM

सध्या महाराष्ट्रासह देशभरात थंडीचा कडाका प्रचंड वाढल्याचं दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात मात्र काही ठिकाणी रात्रीही उकाडा जाणवत होता. पण गेल्या 2 ते 3 दिवसांपासून चांगलीच हुडहुडी जाणवू लागली आहे. पण अचानक एवढी थंडी जाणवण्याचं कारण म्हणजे काश्मीर आहे.

महाराष्ट्रासह उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्येही थंडीचा कडाका वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.कारण काश्मीरमध्ये चक्क पारा शून्य अंशांवर स्थिरावणार असल्याचा अंदाज आहे. या भागातून देशाच्या उर्वरित क्षेत्रांकडे वाहत येणाऱ्या वाऱ्यांमुळं मध्य भारतासह महाराष्ट्रही गारठला आहे. राज्याच्या कोकण पट्ट्यासह उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका अजून वाढणार असल्याचा अंदाज आहे. ज्यामुळं राज्यात ही थंडीची लाट येणार असल्याचे हे संकेत आहे

काश्मीरच्या वातावरणाचा महाराष्ट्रासह देशभर परिणाम

उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका वाढतच असून, काश्मीरच्या खोऱ्यात रात्रीच्या तापमानाचा आकडा वाढत असल्याचं म्हटलं जात आहे. श्रीनगरमध्ये तापमान उणे 3.4 अंशांवर असून, दिवसा त्यात काहीशी सुधारणा होत तापमान शून्यापर्यंत येत आहे. रिपोर्टनुसार 21 डिसेंबरपर्यंत काश्मीरमध्ये हवा कोरडीच राहणार असून, यामुळं तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आणि याचा परिणाम हा संपूर्ण देशभर दिसणार आहे.

देशाच्या दक्षिणेकडील कमी दाबाचा पट्ट्यामुळे वातावरणात गारवा

लक्षद्वीप आणि नजीकच्या क्षेत्रामध्ये चक्राकार वाऱ्यांसाठी पूरक वातावरणनिर्मिती होत असून, इथपासून अंदमानच्या समुद्रकिनारी भागापर्यंत चक्राकार वाऱ्यांमुळं कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे आणि त्याचे थेट परिणाम हे तामिळनाडू आणि नजीकच्या क्षेत्रामध्ये दिसण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

दरम्यान काश्मीरमध्ये घटत जाणारा पार महाराष्ट्रावरही परिणाम करताना दिसत आहे. कारण महाराष्ट्रातही प्रचंड गारठा वाढला असून काही ठिकाणी सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात येत आहे. महाराष्ट्रात पाहायला गेलं तर धुळे, निफाड, अहिल्यानगर, परभणी, गोंदिया, नागपूर, वर्धा, आणि बुलढाणा इथं तापमान 10 अंशांहूनही कमी सांगितलं जात आहे या तापमानात कमी जास्त प्रमाणात थोडे-फार बदल होताना दिसतात. पण गारठा मात्र कायमच आहे. तर, कोकणातील रत्नागिरीमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे

महाराष्ट्रातील सध्याचा गारठा हा असाच राहणार असून उलट यात अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या महाराष्ट्रात जाणवणारा गारठा पाहता लवकरच थंडीची लाट येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे सर्वांनीच आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण वातावरणात जाणवणार हा गारवा नक्कीच तब्येतीवर परिणाम करून आजार वाढवू शकतो त्यामुळे थंडीपासून बचाव करत आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

 

 

 

 

 

 

 

Follow Us