कचरा रस्त्यावर फेकू नका, वारंवार सांगूनही लोकं ऐकेनात, आता केडीएमसी महापालिकेची कठोर युक्ती

| Updated on: Mar 09, 2021 | 2:53 PM

कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी केडीएमसी प्रशासन जीव ओतून मेहनत करतेय पण तरीही काही बेशिस्त नागरिकांमुळे ही समस्या आणखी गंभीर होताना दिसतेय (KDMC take strict action against people who throwing garbage on street).

कचरा रस्त्यावर फेकू नका, वारंवार सांगूनही लोकं ऐकेनात, आता केडीएमसी महापालिकेची कठोर युक्ती
Follow us on

कल्याण (ठाणे) : कचरा हा कल्याणमधला सर्वात मोठा प्रश्न आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी केडीएमसी प्रशासन जीव ओतून मेहनत करतेय पण तरीही काही बेशिस्त नागरिकांमुळे ही समस्या आणखी गंभीर होताना दिसतेय. त्यामुळे केडीएमसी प्रशासनाने आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांना आता थेट कोर्टात हजर राहावे लागणार आहे. केडीएमसी आणि पोलीस पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई सुरु केली आहे (KDMC take strict action against people who throwing garbage on street).

महापालिका आयुक्तांचा पुढाकार

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कचऱ्याचा प्रश्न नेहमीच चर्चेत राहिला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहराला कचरामुक्त करण्यासाठी आणि शहर स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाची मोहीम राबविण्यास सुरुवात केली (KDMC take strict action against people who throwing garbage on street).

आधी दंडात्मक कारवाई, आता थेट कोर्टात हजर करणार

नागरीकांनी शहराला स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन महापालिकेकडून सातत्याने केले जाते. मात्र, तरीही असेही काही नागरीक आहेत जे प्रशासनाच्या उद्देशाला हरताळ फासतात. कल्याण शीळ रस्त्यावर सर्वात जास्त प्रमाणात कचरा रस्त्यावर फेकला जातो. त्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागतो.

काही नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे अखेर महापालिकेने कचरा टाकणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई सुरु केली होती. मात्र त्याचा काही एक फायदा झाल्याचे दिसत नव्हते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने एक नवी मोहिम सुरु केली आहे.

आतापर्यंत अनेकांवर कारवाई

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलीस कायद्यान्वये 115, 117 कलमानुसार कारवाई केली जाते. ज्या नागरीकांच्या विरोधात ही कारवाई केली जाते. त्यांना कोर्टात हजर राहून दंड भरावा लागतो. आतापर्यंत अनेकांच्या विरोधात ही कारवाई केली गेली आहे, अशी माहिती मानपाडाचे पोलीस अधिकारी श्रीकृष्ण गोरी यांनी दिली आहे. त्याचबरोबर यापुढेही अशी कारवाई सुरुच राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.

हेही वाचा : मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची चौकशी एसआयटीद्वारे करणार, गृहमंत्र्यांची घोषणा