केतन अग्रवाल मर्डर प्रकरण, सियाच्या भावावर पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती, 8 तासांपासून चौकशी

18 जून रोजी पुण्यातील तरुण केतन अग्रवाल याचा लोहगडावरून खोल दरीत पडल्याने मृत्यू झाला होता. मात्र केतन याची त्याच्या होणाऱ्या पत्नीनेच हत्या केल्याचं समोर आल्यानं आता या प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं आहे.

केतन अग्रवाल मर्डर प्रकरण, सियाच्या भावावर पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती, 8 तासांपासून चौकशी
siya goyal
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 26, 2026 | 8:36 PM

18 जून रोजी पुण्यातील लोहगडावरून पडून केतन अग्रवाल नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला फोटो काढण्याच्या नादात त्याचा पाय घसरून तो दरीत कोसळला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र त्यानंतर पोलिसांच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली, केतन अग्रवाल याच्या होणाऱ्या पत्नीनेच त्याची हत्या केल्याचं समोर आलं. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. सिया गोयल असं केतन अग्रवाल याच्या होणाऱ्या पत्नीचं नाव आहे. सिया गोयल हिने आपल्या प्रियकराच्या मदतीने केतनची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. त्यांच्या चौकशीमधून दररोज नव नवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

केतनला टक्कल असल्यामुळे त्याच्यासोबत आपल्याला लग्न करायचं नव्हतं, म्हणून आपण ही हत्या केली असं देखील सिया गोयलने पोलीस चौकशीत सांगितल्याची माहिती समोर येत आहे. 18 जून रोजी सियाने आपल्या वाढदिवसाचं निमित्त करून केतन अग्रवाल याला लोहगडावर बोलावलं होतं आणि तिथेच त्याला दरीत ढकलण्यात आलं.

दरम्यान या प्रकरणात आता पोलिसांकडून सियाचा भाऊ साहिल गोयल याची चौकशी सुरू आहे. गेल्या आठ तासांपासून   सियाचा भाऊ साहिल याची चौकशी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरू आहे. या हत्येबाबत कुटुंबाला याची काही माहिती होती का? याची सखोल चौकशी त्याच्याकडे करण्यात येत आहे. तसेच सिया आणि तिचा प्रियकर  यांनी केतनची  हत्या केल्यानंतर आपल्या मोबाईल मधील काही चॅट किंवा पुरावा नष्ट केला का? त्यासंदर्भात तपासणीसाठी त्यांचे मोबाईल देखील पोलिसांकडून पाठवण्यात आले आहेत, यातून काही महत्त्वाचा पुरावा हाती लागण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे आज केतन अग्रवाल याच्या वडिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जावं आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्जवल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी त्यांनी फडणवीस यांच्याकडे केली, फडणवीस यांनी त्याची ही मागणी मान्य केली आहे.

Follow Us