Massajog Election Result : मस्साजोगचा धक्कादायक निकाल, संतोष देशमुखांची पत्नी हरली, वहिनीच्या पराभवावर धनंजय देशमुख म्हणाले की..

Massajog Election Result : मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या निधनामुळे सरंपचपदासाठी पोटनिवडणूक झाली. पण निकाल खूप अनपेक्षित लागला. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख यांचा या निवडणुकीत पराभव झाला.

Massajog  Election Result : मस्साजोगचा धक्कादायक निकाल, संतोष देशमुखांची पत्नी हरली, वहिनीच्या पराभवावर धनंजय देशमुख म्हणाले की..
Massajog Election Result
| Updated on: Apr 29, 2026 | 1:28 PM

दीड वर्षांपूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरणाने महाराष्ट्राच राजकारणं ढवळून निघालं होतं. 9 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत क्रूर पद्धतीने मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. माणूसकी कुठे हरवली? असा प्रश्न या हत्याकांडाने उपस्थित झाला होता. या प्रकरणात वाल्मिक कराड आजही तुरुंगात आहे. या हत्याकांडामुळे धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. कारण वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणाशी नाव जोडलं गेल्याने धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभरात मोर्चे निघाले होते. मस्साजोगमध्ये ग्रामस्थ अनेकदा आंदोलनाला बसले होते.

त्याच मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या निधनामुळे सरंपचपदासाठी पोटनिवडणूक झाली. पण निकाल खूप अनपेक्षित लागला. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख यांचा या निवडणुकीत पराभव झाला. स्वरूपानंद देशमुख यांनी 92 मतांच्या फरकाने त्यांचा पराभव केला. खरंतर हा शॉकिंग निकाल आहे. या निकालावर संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आमचा भाऊ गेल्याने सगळ्यात मोठं नुकसान झालं. त्यामुळे हा पराभव गौण आहे. झालेला पराभव, गावकऱ्यांनी दिलेला कौल मान्य करतो” अशी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाल्यानंतर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली.

न्यायाची लढाई शेवटी कुटुंबीयांना लढावी लागणार

“ज्या काही अफवा पसरवल्या त्या यापुढे पसरवू नयेत ही विनंती. न्यायाची लढाई शेवटी कुटुंबीयांना आणि आम्हाला लढावी लागणार आहे. गावकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही ती लढू. CSR फंड आणला असा आरोप केला ते पुराव्यानिशी दाखवावे. संतोष अण्णाच्या स्वप्नातलं गाव करण्यासाठी प्रयत्न करणार” असं धनंजय देशमुख म्हणाले.

कुठल्या फेरीत किती मतं मिळाली ?

स्वरुपानंद देशमुख 92 मताने विजयी झाले. पहिल्या फेरीत ते 156 मतांनी आघाडीवर होते.दुसऱ्या फेरीत 20 मतांनी आघाडीवर होते. शेवटच्या तिसऱ्या फेरीत ते 92 मताने विजयी झाले. स्वरुपानंद देशमुख हे संतोष देशमुख यांना अभिवादन करून देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध करुन संतोष अण्णांना खरी श्रद्धांजली द्यावी, अशी इच्छा व्यक्त करण्यात येत होती.मात्र स्वरूपानंद देशमुख यांनी शेवटपर्यंत अर्ज मागे घेण्यास नकार दिला.

Follow Us