ह्या बातमीचा महाराष्ट्राला अभिमान, लातुरात हळदी कुंकवाला तृतीय पंथी !

| Updated on: Feb 02, 2021 | 4:25 PM

लातूरच्या प्रितम जाधव यांनी यावर्षी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचं जरा हटके आयोजन केलं. या कार्यक्रमाला त्यांनी महिलांसह तृतीय पंथीयांनाही निमंत्रित केलं (Latur woman invite transgender for traditional program).

ह्या बातमीचा महाराष्ट्राला अभिमान, लातुरात हळदी कुंकवाला तृतीय पंथी !
Follow us on

लातूर : हळदी-कुंकू हा महिलांचा आवडता कार्यक्रम! मकरसंक्रांतीनंतर वाण लुटण्यासाठी सुवासिनींना घरी बोलावून त्यांचं आदरातिथ्य करण्याचा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी अनेकजणी वेगवगेळ्या स्वरुपात करीत असतात. लातूरच्या प्रितम जाधव यांनीही यावर्षी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचं जरा हटके आयोजन केलं. या कार्यक्रमाला त्यांनी महिलांसह तृतीय पंथीयांनाही निमंत्रित केलं. तृतीय पंथियांना हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात पाहून अनेकजणी आश्चर्यचकित झाल्या (Latur woman invite transgender for traditional program).

तृतीय पंथीयांना सहसा कोणी कोणत्या घरगुती कार्यक्रमात सहभागी करून घेत नाही. महिला तर तृतीय पंथीयांपासून थोड्या दूरच असतात. मात्र लातूरच्या प्रीतम जाधव यांनी तृतीय पंथीयांना हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात बोलावून नव्या प्रथेला सुरुवात केली आहे. तृतीय पंथीय देखील आपल्याच समाजाचा घटक आहेत आणि त्यांनाही इतरांप्रमाणेच आपण कोणत्या उत्सवात किंवा कार्य्रक्रमात सामावून घेतलं पाहिजे. हा त्यामागचा हेतू होता.

हळदी-कुंकुवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या खेळांचेही आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सगळ्याजणी खेळात दंग झाल्या. सुरुवातीला सुरु असलेली काही जणींची कुजबुजही नंतर बंद झाली. या कार्यक्रमात वाण म्हणून महिलांना सॅनिटरी नॅपकीन भेट म्हणून देण्यात आली (Latur woman invite transgender for traditional program).

तृतीयपंथींबाबत महाराष्ट्रात जागरुकता

तृतीयपंती देखील एक माणूस आहे. त्यांनादेखील जगण्याचा अधिकार आहे. याच भावनेचा विचार करुन आज पुरोगामी महाराष्ट्र तृतीयपंथी समूहाचा स्वीकार करताना दिसत आहे. तृतीयपंथी महिलांना हटकलं जाण्याचं किंवा नकारात्मक दृष्टीकोनाने बघायच्या गोष्टी याआधी अनेकवेळा घडल्या आहेत. मात्र, या जुन्या गोष्टी मागे सारत महाराष्ट्रातील जागृत समाज तृतीयपंथींचा स्वीकार करत आहे. त्यांचा सन्मान करत आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये जळगावच्या भादली बुद्रूक गावात तृतीयपंथी उमेदवार अंजली पाटील विजयी झाल्या. विशेष म्हणजे या निवडणुकीत त्या महाराष्ट्रभरातील एकमेव तृतीयपंथी उमेदवार होत्या. त्यांना उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भरपूर संघर्ष करावा लागला होता. कारण त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना नावापुढे लिंगाचा उल्लेख ‘इतर’ असा केल्याने त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली होती. याबाबत अंजली पाटील यांनी आपल्या उमेदवारीसाठी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. न्यायालयाने अंजली पाटील यांच्या बाजूने निकाल देत त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला होता. त्यानंतर गावात त्या निवडूनही आल्या.

हेही वाचा : तिचं शिक्षण मुंबईत, नोकरीला लाथ, 10 हजारात बिझनेस सुरू, आता टर्नओव्हर कोटीत; वाचा प्रेरणादायी बातमी!